डहाणू : डहाणू तालुक्यातील नरपड ठाकूरवाडी येथील पती-पत्नीचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुजरातच्या उंबरगाव औद्योगिक वसाहतीत कामावर जात असताना हा अपघात घडला. अपघाताची ही घटना शुक्रवार, दि. 6 रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास डहाणू-बोर्डी प्रमुख राज्य मार्गावर, बोर्डीतील अमृतवाडी येथे घडली.
संजय ठाकूर (वय 44) आणि त्यांची पत्नी भावना ठाकूर (वय 37) हे आपल्या दुचाकीवरून जात असताना, समोरून येणार्या टेम्पोने जोरदार धडक दिली. टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो दुचाकीवर आदळल्यामुळे या अपघातात संजय आणि भावना गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने डहाणू शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान संजयचा मृत्यू झाला. काही तासांनंतर भावनाचाही मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेनंतर बोर्डीतील ग्रामस्थांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. रस्त्यालगत असलेले विजेचे खांब तत्काळ हटविणे, रस्त्याची साईटपट्टी तयार करणे आणि रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्या छाटणे, जेणेकरून वाहनचालकांना अडथळा होणार नाही, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत. बोर्डी ग्रामपंचायतीत झालेल्या चर्चेत, महावितरण विभागाचे अधिकारी पदमिरे यांनी रस्त्यालगतचे खांब दोन दिवसात हटविण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, अपघाताच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी, बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाईचे आदेश घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांनी दिले आहेत.