खडवली : खडवली भातसा नदीवरील हा पूल दोन तालुक्यांना जोडणारा एकमेव पूल असून यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र पुलाचे कठडे अखेरची घटका मोजत असून वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.
खडवली भातसा नदीवरील पूल मुंबई नाशिक महामार्गाला सुद्धा जोडणारा पूल आहे. या मार्गावरील पडघा परिसरातील अनेक छोट्या मोठ्या गावातून लोक मुंबईच्या दिशेने प्रवास करतात त्यांना खडवली रेल्वे स्थानक पर्यंत आणायचे काम सुद्धा हाच पुल करतो. तसेच खडवली परिसरातील शाळकरी विद्यार्थी तसेच कामगार वर्ग, पडगा भिवंडीकडे गोदमात कामाला जाण्यासाठी ह्याच पुलाचा वापर करतात. इतक्या महत्त्वाचा आणि सतत रहदारी असणारा हा पूल मागील काही वर्षांपूर्वी दुरावस्थेत आहे. त्यानंतर पुलाच्या बाजूला असणार्या लोखंडी पाईपाची तट पुरात वाहून गेले आहेत.
इतके वर्षे ओलांडून सुद्धा प्रशासन याकडे कानाडोळा करीत असल्याची खंत नागरिक व पर्यटन बोलून दाखवत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून पुलाची डागडुजी करण्यात प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत का? तसेच अनेक वेळा प्रवासी रेल्वे स्थानकावर पोहोचण्यासाठी वाहन वेगात चालवत असतात अशा वेळेस व रात्रीच्या वेळेस अंधार असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने एखादे वाहन नदीत पडून मोठा अपघात होऊ शकतो. आता तर पुलाचे तुटलेले पाईप सुद्धा दुरुस्त केव्हा करणार? प्रशासन कधी जागे होणार? असा प्रश्न कामगार वर्ग व वाहन चालक करीत आहे.