नाट्यमयरित्या महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. कोणाला आणि किती आमदारांना संधी द्यायची, यावर खलबते होऊन अखेर 39 दिवसांनी राज्याला 20 मंत्र्यांचे मंत्रिमंडळ लाभले. त्याचवेळी पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा नाही, ही रणनीती यशस्वी झाल्याबाबत शिवसेना-भाजपाच्या इच्छुक आमदारांमध्ये खमंग चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे एकूण 43 मंत्रीपदे असतानाही केवळ 28 मंत्र्याच्या जोरावर मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याचा कारभार हाकला.
शिवसनेच्या मंत्र्यांसह 40 आमदारांना सोबत घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 रोजी शपथ घेतली. सोबत फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शपथ देण्यात आली. त्यांच्यासोबत एकाही कॅबिनेट मंत्र्याला शपथ देण्यात आली नाही. अखेर विरोधी पक्षांची टीका आणि आमदारांच्या वाढत्या दबावानंतर 9 ऑगस्ट रोजी शिवसेना-भाजपच्या प्रत्येकी 9-9 अशा 18 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. पुन्हा पालकमंत्री पदावरून वाद रंगला आणि 15 ऑगस्टला मंत्री असूनही जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झेंडा फडकविण्यात आले.
शिवसेना-भाजप युतीमधील आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी लागलेली चढाओढ, रस्सीखेच आणि नाराजी लक्षात घेऊन पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार करायचाच नाही, अशी छुपी रणनीती आखण्यात आली. त्याची वाच्यता फारसी झाली नसली तरी काही आमदार, मंत्री यांना याची कल्पना होती. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले आमदार आणि मंत्र्यांचा समावेश आहे. जसे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी मंत्र्यांची शपथ घेण्यासाठी कोट शिवला होता, तसे विजयी हॅट्रिक साधणारे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनाही मंत्रिमंडळात स्थान अपेक्षित होता. मात्र पुढे काय वाढून ठेवले आहे, याची स्पष्ट कल्पना असल्याने अन्य आमदारांप्रमाणे किणीकर यांनी शपथविधी करिता नवीन कोट शिवून घेतला नाही. तशी खंतही त्यांनी अनेकदा मंत्र्याच्या उपस्थित खासगीत बोलून दाखविलेली आहे. तर एस टी महामंडळाचे अध्यक्ष शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी जाहीर व्यासपिठावरून मंत्री का बनलो नाही, हे उघड केलेले आहे.