डोंबिवली : मुंबई महानगर प्रदेश विकास क्षेत्रात असलेल्या कल्याण-डोंबिवलीतील खासगी आणि शासकीय जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. प्रत्येक लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळायला हवा, या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याच्या सूचना भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार चव्हाण यांच्या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देऊन ही योजना लवकरच कार्यान्वीत करण्यात येणार असल्याची ग्वाही प्राधिकरण अधिकाऱ्यांनी यांनी दिली.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात किती अंमलबजावणी झाली ? करायची असेल तर ती कशा पध्दतीने करता येईल ? लाभार्थ्यांना या योजनेचा अधिकाधिक लाभ कसा मिळेल ? आदी प्रश्न उपस्थित करून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी, याकडे भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे बैठकीत लक्ष वेधले. या बैठकीला प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी अश्विनी जोशी, तहसीलदार विजय वाकोडे, सहाय्यक अधिकारी हर्षद घोटेकर उपस्थित होते.
मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसह ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भागात ही योजना तातडीने राबविण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे तेथे या योजनेचा विनाविलंब शुभारंभ करावा. या योजनेतून खरा लाभार्थी अजिबात वंचित राहता कामा नये. प्राधिकरणाच्या अन्य क्षेत्रातही खासगी आणि शासकीय जमिनींवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे, तसेच गतिमानतेने राबविता येईल, यासाठी प्राधिकरणाने वेगाने हालचाली सुरू कराव्यात. या योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे येत असल्यास त्याचे शासन पातळीवर निराकरण करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन आमदार रविंद्र चव्हाण यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले.
आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या सूचनांचा आदर करून ही योजना कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यासाठी आम्ही सज्ज असल्याची माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही दिली. डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या सूचनांनुसार
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याचे वृत्त कल्याण-डोंबिवलीत येऊन आदळताच झोपडपट्टीवासीयांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर हक्काचे घर मिळणार असल्याने कल्याण-डोंबिवलीतील झोपडपट्टीवासीयांचा आनंद द्विगुणित झाला आहे.