भिवंडी : भिवंडी शहरात वीस वर्षीय तरुणाचा श्वानदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान यापूर्वीही एका चिमुरडीचा श्वानदंशाने मृत्यू झाल्याची घटना पाहता या तरुणाचा मृत्यू पाहता ही श्वानदंशाची दुसरी घटना असल्याचे समजते.
भिवंडी शहरात भटक्या श्वानांचा उपद्वाप मोठ्या प्रमाणात वाढला असून मागील महिन्यात श्वान दंश झालेल्या 20 वर्षीय तरुणाचा मुंबई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभारावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अलस कुरेशी (20) रा. कसाई वाडा निजामपुरा असे श्वान दंशाने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मागील महिन्यात अलस यास भटक्या श्वानाने चावा घेतला होता. त्यानंतर काही दिवसानंतर त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान सप्टेंबर या एका महिन्यातच 651 श्वानदंशाच्या घटना घडल्या आहेत. तर यापूर्वी एका चार वर्षीय चिमुरडीचा श्वान दंशाने 25 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता.