ठाणे: शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि धोकामुक्त करण्यासाठी परिवहन विभागाने शालेय बस तपासणी मोहीम वेगाने सुरू केली असून, ठाणे जिल्ह्यातील सुमारे ६० टक्के शालेय बसांची तपासणी पूर्ण झाली आहे.
नियमांची पूर्तता करणाऱ्या बसनाच पात्रता प्रमाणपत्र देण्यात येत असून, विद्यार्थी वाहतुकीची परवानगी केवळ अधिकृत शालेय बसनाच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रिक्षा, व्हॅन किंवा इतर वाहनांमधून होणारी विद्यार्थी वाहतूक बेकायदा असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात जिल्हास्तरीय स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक उपआयुक्त पंकज शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत प्रत्येक शालेय वाहनावर डॅशकॅम बसविणे, चालक व अटेंडंटना रस्ता सुरक्षा प्रशिक्षण देणे, ब्रेथ ॲनालायझरद्वारे नियमित तपासणी करणे तसेच शाळेजवळ बस वेळेआधी उभ्या करण्यासारख्या उपाययोजनांवर भर देण्यात आला.
राज्य शासनाच्या नियमावलीनुसार शालेय बसला पिवळा रंग, अनुभवी व परवानाधारक चालक, विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती, महिला सहाय्यक तसेच १२ वर्षांपेक्षा कमी वयाची बस असणे बंधनकारक आहे. या सर्व बाबींची तपासणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात सुमारे अडीच हजार अधिकृत शालेय बस असून त्यापैकी ६० टक्के बसांची तपासणी पूर्ण झाली आहे.
तसेच बसचा वेग ताशी ४० किलोमीटरपेक्षा अधिक नसावा, असेही बंधन घालण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत प्रत्येक बसमध्ये चित्रमुद्रक यंत्र बसविणे, चालक व सहाय्यकांना रस्ता सुरक्षा प्रशिक्षण देणे, मद्यपान तपासणी यंत्राद्वारे नियमित चाचणी करणे तसेच शाळेजवळ वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसून, प्रशासन, शाळा व्यवस्थापन, बस मालक आणि चालक यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.