ठाणे : महाराष्ट्रात सन 2025 मध्ये तब्बल 36,450 रस्ता अपघातांची नोंद झाली असून 15,549 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 57 टक्के दुचाकीस्वार तर 21टक्के पादचारी असल्याचे अधिकृत आकडे सांगतात. या भयावह पार्श्वभूमीवर 2026 हे वर्ष ‘दुचाकीस्वार आणि पादचारी बचाव अभियान’ म्हणून जाहीर करण्यात आले असून ठाणे शहरातही कडक अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यातील वाढत्या अपघातांच्या छायेत ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्थेकडे आता विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. या भीषण पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या आदेशानुसार 2026 हे वर्ष ‘दुचाकीस्वार आणि पादचारी बचाव अभियान’ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. शहरातील आणि उपनगरांतील अपघातप्रवण रस्त्यांवर विशेष मोहीम राबविण्यात येणार असून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी कठोरपणे केली जाणार आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.
पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठीही ठाण्यात विशेष उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी पादचारी अपघातांचे प्रमाण जास्त आहे, तेथे झेब्रा क्रॉसिंग, सुरक्षित पदपथ, प्रकाशयोजना आणि रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार आहे. संबंधित विभागांशी समन्वय साधून ब्लॅक स्पॉट्सवर तातडीने सुधारणा करण्यात येणार आहेत.
1 जानेवारी 2026 पासून प्रत्येक अपघाताची एफआयआर तपासून त्याचे सखोल विश्लेषण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ठाणे परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षकांना अपघातांचे मूळ कारण शोधून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मागील तीन वर्षांतील अपघातग्रस्त ठिकाणांचा नकाशा तयार करून सातत्याने अपघात होणाऱ्या ठिकाणी विशेष लक्ष दिले जाणार आहे. वेगमर्यादा नियंत्रणासाठी रडारयुक्त इंटरसेप्टर वाहने तैनात केली जाणार असून अंमलबजावणी अधिक कठोर करण्यात येणार आहे. राज्यातील भीषण आकडेवारी लक्षात घेता ठाणे शहरात प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जाणार आहे. वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेटचा वापर आणि जबाबदार वाहनचालकत्व याच माध्यमातून अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते, अपघातमुक्त ठाणे आणि सुरक्षित महाराष्ट्राच्या दिशेने हे पाऊल निर्णायक ठरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणे-भिवंडी-पाडघा-शहापूर या प्रमुख आणि अतिवर्दळीच्या मार्गावर दुचाकीस्वार तसेच पादचारी अपघात घडतात. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला असून विशेष ‘दुचाकीस्वार व पादचारी बचाव अभियान’ काटेकोरपणे राबविण्यात येणारहेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे