ठाणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून ई चलान द्वारे दंड आकारण्यात येतो. मात्र वर्षानुवर्षे दंडाची रक्कम थकीत ठेवणार्या रिक्षा चालकांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी आता धडक कारवाईची मोहीम सुरु केली आहे. अशा रिक्षाचालकाच्या रिक्षा ताब्यात घेण्यास सुरुवात केली असून, नियमांचे उल्लंघन करणार्या मुजोर रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत.
एका रिक्षाचालकाविरोधात 205 ई-चलान कारवाई करण्यात आली असून त्याविरोधात 3 लाख 6 हजार 650 रुपये दंडाची रक्कम थकीत आहे.
तर एका रिक्षाचालकाविरोधात 82 ई- चलान थकीत असून त्याच्याकडे 1 लाख 11 हजार 250 एवढा दंड थकीत होता.
तिसर्या एका रिक्षाचालकावर 39 ई- चलान कारवाई झाल्या असून त्याविरोधात 62 हजार 100 रुपये दंड प्रलंबित असल्याचे समोर आले.
या तिन्ही रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
गेल्या काही वर्षात ठाणे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात रिक्षा वाढल्या आहेत. अनेकदा रिक्षा चालकांकडून नियमबाह्य पद्धतीने रिक्षा चालविल्या जातात. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात रिक्षाचालकांविरोधात ई चलान यंत्राद्वारे कारवाई केली जाते. नियमबाह्य रिक्षा चालविणार्या चालकांचे चलान कापत पोलिस दंड सुद्धा ठोठावत आहेत. मात्र अनेक रिक्षा चालकांनी हा दंड थकीत ठेवला आहे. अनेकदा नियम मोडणार्या रिक्षा चालकाला अडविल्यास ते तिथून पलायन करतात. मात्र ई चलान यंत्राच्या माध्यमातून छायाचित्र काढून पोलीस संबंधित रिक्षालकाविरोधात कारवाई करतात. रिक्षा चालकाविरोधात ई- चलानच्या माध्यमातून करण्यात आलेली दंडाची रक्कम थकीत ठेवली जात असते. मागील काही वर्षांमध्ये काही रिक्षाचालकांवर हा थकीत दंड लाख रुपयांच्या घरात गेला आहे.
दंडाची रक्कम मोठ्याप्रमाणात प्रलंबित ठेवणार्यांविरोधात कारवाई सुरू राहील.पंकज शिरसाट, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे