बदलापूर : मुंबईहून कर्जतकडे जाणार्या मालगाडीचे इंजिन डाऊन झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. डाऊन दिशेला चाललेल्या मालगाडीचे इंजिन बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ आल्यानंतर बंद पडले. सिग्नल यंत्रणा आणि अचानक झालेल्या या घडामोडी मुंबईहून बदलापूरच्या दिशेने येणार्या अनेक लोकल आणि मेल गाड्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे घरी परतणार्या चाकरमान्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.
अंबरनाथ ते कल्याण या स्थानकांच्या दरम्यान अनेक लोकल आणि मेल गाड्या खोळंबून राहिल्या होत्या. बुधवार (दि.३१) रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. तब्बल दीड तासाने कल्याण येथून आलेल्या विशेष इंजिनाने ही मालगाडी पुढे नेण्यात आली. दरम्यानच्या काळात बदलापूर ते कर्जत या डाऊन मार्गावर एकही लोकल धावली नाही. त्यामुळे अप दिशेलाही त्याचा फटका बसला. कारण बदलापूर आणि कर्जत कडे जाणार्या अनेक लोकल गाड्या अंबरनाथ ते कल्याण या स्थानकांच्या दरम्यान खोळंबल्या होत्या. मध्य रेल्वेची वाहतूक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उशिराने होत असल्याने आधीच प्रवाशांना त्रास होत आहे. त्यातच अश्या तांत्रिक दोषामुळे मध्य रेल्वेचे वाहतूक खोळंबत असल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.
अंबरनाथ वरून बदलापूरला येणार्या लोकल ट्रेन बंद पडल्यामुळे अंबरनाथ ते बदलापूर असा प्रवास करणार्या प्रवाशांची रिक्षा चालकांनी अक्षरशः लुट केली. 30 रुपये घेणारे रिक्षाचालक हे शंभर ते दोनशे रुपये प्रति मानसी रिक्षा भाडे आकारत होते. वाहतूक पोलिस आणि आरटीओ याकडे गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे अनेक रिक्षा चालक हे अशा प्रकारे लूट करतात. या विरोधात आरटीओने ग्राहकांचे अडवणूक करून लुबाडणूक करणार्या रिक्षाचालकांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.