Anand Paranjpe vs Vikas Lawande
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा कथित बनावट फोटो तयार करून त्यांना आरोपी कॅप्टन अशोक खरात यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करत, पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी विकास लवांडे यांच्या टीकेवर जोरदार पलटवार केला आहे. लवांडे यांनी केलेली वक्तव्ये व सोशल मीडियावरील पोस्ट अत्यंत खालच्या पातळीची असल्याचे परांजपे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅप्टन अशोक खरात यांना महिलांच्या शारीरिक शोषणाच्या आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाशी नाव जोडले गेल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला. यानंतर सुषमा अंधारे आणि रूपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांना सहआरोपी करण्याची मागणी करत राजकीय वातावरण तापवले.
या पार्श्वभूमीवर विकास लवांडे यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत सुनील तटकरे यांच्या बोटावरील जखमेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या टीकेला उत्तर देताना आनंद परांजपे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचे आरोप आणि फोटो प्रसारित करणे हे असभ्य राजकारणाचे उदाहरण आहे आणि याची दखल घेतली जाईल.
तटकरे यांच्या जखमेबाबत स्पष्टीकरण देताना परांजपे म्हणाले की, प्रचारादरम्यान त्यांना ही दुखापत झाली होती. त्याचा कोणत्याही वादग्रस्त प्रकरणाशी संबंध नाही. परांजपे यांनी इशारा देत असेही म्हटले की, लवांडे ठाण्यात आल्यास कार्यकर्ते त्यांना योग्य उत्तर देतील. तसेच, विनाकारण आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी ठोस पुरावे असल्यास ते तपास यंत्रणांकडे सादर करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षांतर्गत मतभेद असल्यास ते सार्वजनिकरित्या मांडण्याऐवजी संबंधित नेतृत्वाकडे मांडावेत, असे सांगतानाच, सुनेत्रा पवार यांच्याकडे मुद्दे मांडण्याचा सल्लाही त्यांनी दिला.शेवटी, रूपाली चाकणकर यांच्यावर करण्यात आलेले आरोपही निराधार व खालच्या पातळीचे असल्याचे परांजपे यांनी ठामपणे सांगितले.