ठाणे: यंदाच्या दहीहंडी उत्सवाचे जोरदार स्वागत करण्यासाठी ठाणेकर सज्ज झाले असून सणाच्या काळात कुठेही कायदा सुव्यवस्था बाधित होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने पुरेपूर खबरदारी घेतली आहे. दहीहंडी उत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावला आहे.
दहीहंडीचा उत्सव म्हटला की गोविंदांच्या घोषणांनी संपूर्ण ठाणे दणाणून जाते. ठाणेच नव्हे तर मुंबईतून देखील मोठ्या संख्येने गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी ठाण्यात येतात.
उंचच उंच थर लावण्यासाठी प्रत्येक मंडळांमध्ये चुरशीची स्पर्धा असल्याने गोविंदा पथकांच्या सरावाला मे जूनपासून सुरुवात झाली आहे. एकीकडे गोपाळकालाचा उत्साह सगळीकडे दिसून येत असतांना कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस दलाने जोरदार तयारी केली आहे.
तसेच गोविंदा मंडळांना व दहीहंडी आयोजकांना काही नियम आखून दिले आहेत. त्यात दहीहंडीच्या ठिकाणी गाद्या ठेवणे, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट आदी सुरक्षा उपाययोजना असावी. तसेच वीस फुटांपेक्षा जास्त उंचीवर दहीहंडी बांधू नये.
तसेच बारा वर्षांखालील मुलांना दहीहंडी फोडण्यास कोर्टाने सक्त मनाई केली आहे. त्यानुसार लहान मुलांचा दहीहंडी फोडण्यासाठी वापर करू नये. तसेच डीजे व साऊंड सिस्टीमचा आवाज नियमानुसार मर्यादित ठेवावा, वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी दहीहंडी बांधू नये असे नियम घालून देण्यात आले आहेत.
दरम्यान, गोपाळकाला उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आयुक्तलय हद्दीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सण उत्साहात व शांततेत साजरा व्हावा यासाठी ठाणे शहर पोलीस दलातर्फे अधिकारी व कर्मचारी असे एकूण साडे चार हजाराहून अधिक पोलीस फौजफाटा सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहे. तसेच मुख्य मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार असून वाहतूक पोलिसांनी देखील ठिकठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत.
बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी करूनच त्यांना शहरात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. त्याचप्रमाणे उपद्रवी ठरणाऱ्या व्यक्तींवर आणि गुन्हेगारांवर अत्यंत करडी नजर ठेवली जाणार आहे.
सुरक्षा व्यवस्थेला कुठल्याही प्रकारे गालबोट लागू नये यासाठी पोलीस हिटलिस्टवर असणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीचे व्यक्तींना पोलीस प्रशासनाच्यावतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सुरक्षा व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी पथक
महिलांच्या छेडछाडीसारख्या प्रकारांना आळा बसावा म्हणून ठाणे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. तरुणी व महिलांसोबत होणारे छेडछाडीचे गैरप्रकार रोखण्यासाठी निर्भया, दामिनी आणि पोलीस दीदी असे विविध पथके दहीहंडीच्या दिवशी गस्तीवर असणार आहेत.
महिलांच्या बाबतीत कुठेही अनुचित प्रकार घडला तर हे पथक घटनास्थळी पोहचून त्वरित मदत करणार आहे. महिलांसोबत काही गैरप्रकार समोर आल्यास जवळच्या पोलीस स्टेशनशी अथवा हेल्पलाईनवर संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.