ठाणे/ वसई: ठाणे -पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलला पराभूत करून सहकार पॅनेलने २१ पैकी १६ जागा जिंकल्या असल्या तरी आता अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा शिवसेना महायुती म्हणून एकत्र येणार असल्याचे जाहीर करीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बँकेवर महायुतीचीच सत्ता येणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे ८ जागा जिंकलेली बहुजन विकास आघाडी बँकेत सत्तास्थानापासून दूर राहणार असल्याचे पुढे आले आहे.
पॅनलनूसार झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी वसई यांना ८ जागा तर भाजपाचे आमदार किसन कथोरे आणि शिंदे शिवसेना मिळून ८ जागा असे यश मिळाले होते. निवडणुक निकाल जाहीर झाल्यानंतर सहकार पॅनल जिंकल्याचे घोषीत करण्यात आले. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुती विजयी झाल्याचे सांगितल्याने आता या निवडणुकीनंतर सत्ता समीकरणांचा नवा टिव्सट आला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्पष्टीकरण देताना सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनल अशी लढत झाली असली तरी दोन्ही पॅनलमधून भाजपाचे ८ संचालक विजयी झाले आहेत. तर शिंदेच्या शिवसेनेचे ५ संचालक विजयी झाले आहेत. त्यामुळे आमची एकूण बेरीज १३ झाली आहे. आणि २१ संचालकांच्या बॅकेमध्ये १३ हे बहुमताचा आकडा आहे.त्यामुळे अडीच वर्ष बँकेचा अध्यक्ष भाजपाचा होई तर अडीच वर्ष अध्यक्ष शिवसेनेचा होईल. असे सांगत अध्यक्षपदापासून बहुजन विकास आघाडी दूर राहणार असल्याचे संकेत दिले.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पॅनल पद्धतीने झालेल्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात सत्तेतील मित्रपक्ष असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेचे शिलेदारच एकमेकांविरुद्ध लढत असल्याचे पाहायला मिळाले. अखेर या निवडणुकीत 'परिवर्तन पॅनल'चा पराभव करत
'सहकार पॅनल'ने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. वस्तुतः ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. बहुजन विकास आघाडीकडून या बँकेतील सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकीत राजकीय चाणक्यनीतीचा अवलंब केला.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती निवडणुकीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या माध्यमातून शिंदेसेनेच्या काही उमेदवारांसोबतच आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वात भाजपचे काही उमेदवार उभे होते.
तर त्यांच्या समोर उभ्या ठाकलेल्या 'परिवर्तन पॅनल'मध्येही भाजपचे ४ तर शिंदेसेनेचे ३ उमेदवार उभे होते. दोन्ही पॅनलमध्ये आपले उमेदवार उभे करण्यामागे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याचे कारण दोन्हीही नेत्यांकडून देण्यात आले होते.
बविआ, शिवसेना समीकरणाला खो
खरतर या निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय होवून शिंदे शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी यांचे राजकीय समीकरण तयार होत होते मात्र मुंबईत महायुतीच्या नेत्यांची बैठक होवून सत्तेतील पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय झाल्यामुळे बहुजन विकास आघाडीला धक्का बसला आहे. आता महायुती म्हणूनच बँकेचे सत्तेचे समीकरण जुळवले जाणार आहे. त्यामुळे गेली अनेक वर्ष ठाण-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वसई बहुजन विकास आघाडीच्या असलेल्या वर्चस्वाला हा धक्का मानला जात आहे.