ठाणे : परतीच्या पावसाला आता सुरुवात झाली असून ठिकठिकाणी झाड झुडप वाढलेली आहेत. निसर्ग चांगलाच नटला असताना, मात्र साप विंचू सारख्या विषारी जीवांचा धोका ही तितकाच आहे. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण अणि दुर्गम भागात सर्पानी दंश केलेल्या तब्बल 100 व्यक्तींवर ठाणे सिव्हील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
वरुणराजा यंदाच्या मोसमात चांगलाच बरसला आहे. मुंबई-ठाणे शहराला पाणी पुरवठा करणार्या जलसाठ्यात समाधान कारक पाऊस पडला आहे. बळीराजा देखील खुश असला तरी, या काळात सरपटणार्या प्राण्याचा संचार वाढलेला दिसून येतो. झाडा झुडपात चालताना साप विंचू सारखे जीव चावण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे चालताना खूप सावध अणि सुरक्षित चालणे गरजेचे आहे. रानवाटा, गवत, अडगळीच्या जागेत दडून बसलेला साप दंश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाणे सिव्हील रुग्णालयात गेल्या साडेतीन महिन्यात 100 सर्पदंश झालेले रुग्ण उपचारासाठी आले होते.
भिवंडी रेल्वे स्थानकातून रात्रीच्या वेळी घरी जात असताना, अचानक अनोळखी साप पायाला चावला. घरी जाईपर्यंत डोळ्यासमोर अंधारी आली. कुटुंबीयांनी तात्काळ धावाधाव करत ठाणे सिव्हील रुग्णालयात दाखल केलं. वेळेत चांगले उपचार मिळाल्याने मी आता बरा झालो.सागर म्हस्के, धामणकर नाका, भिवंडी, ठाणे.
ठाणे जिल्ह्यात मण्यार, घोणस, नाग आणि फुरसे है चार प्रामुख्याने विषारी साप आढळतात. यामध्ये मण्यार साप सर्वाधिक विषारी असून, हा साप चावल्यावर वेळेत उपचार मिळणे गरजेचे आहे. अन्यथा रुग्णाचा मृत्यूचा धोका वाढतो. रात्रीच्या वेळेत या सापाचा संचार जास्त असून, झोपलेले असताना, अथवा झाडी झुडप गवतातून चालताना हा साप दंश करतो. हा साप चावला तरी पटकन समजून येत नाही. मात्र या सापाचे विष अधिकच धोकेदायक आहे. गेल्या काही दिवसात मण्यार अणि घोणस साप चावल्याचे रुग्ण उपचारासाठी आले होते.
एखाद्या व्यक्तीस साप चावला आहे. असे समजल्यावर क्षणाचाही विलंब न करता तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी न्यावे. काही वेळा मांत्रिक, भगत अथवा भक्ताकडे सापाचे विष उतरवण्यासाठी नेल जात. मात्र वेळेत सर्प दंश झालेल्या व्यक्तीला उपचार मिळाले नाही तर रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. आपल्या सर्व शासकीय रुग्णालयात सर्प दंशावर औषध उपलब्ध आहेत.डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे