डोंबिवली : घोडबंदर मार्गावर होणार्या वाहतूक कोंडीचा सामना रोजच वाहनचालकांना करावा लागत असून बुधवारी (दि.7) रोजी पहाटे या मार्गावर तेल सांडल्याने ऐन सकाळीच या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. तेल सांडल्याने वाहनाचा वेग मंदावला आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने भाईंदरपाडा पासूनच वाहतूककोंडी मानपाडापर्यंत गेल्याचे पाहायला मिळाले.
घोडबंदर मार्गावर आहे वाहतूक कोंडी आता तित्याचीच झाली आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे या मार्गावर वाहतूककोंडी होत असून यामुळे वाहनचालकांना रोजचाच मनःस्ताप सहन करावा लागत आहे. बुधवारी पहाटे देखील या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. बुधवारी पहाटे तेल सांडल्याने त्याचा परिणाम सकाळपासून जाणवू लागला. भाईंदर पाडा ते मानपाडा पर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या. ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणार्या मार्गावर तेल सांडल्याने ही वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतुकीचा अक्षरशः खोळंबा झाला होता. भाईंदर पाडा ते मानपाडापर्यंत वाहनाच्या रांगा यामुळे लागल्या होत्या. वाहतूककोंडीमुळे ठाण्याहून बोरिवली, वसई, भाईंदर, पालघरच्या दिशेने जाणार्या वाहन चालकांचे हाल झाले आहेत. सकाळी ही वाहतूककोंडी झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना अर्धा तास लागला. शाळेच्या बस गाड्या तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनेही या कोंडीत अडकून पडल्याचे पाहायला मिळाले. मागील काही दिवसांपासून ठाण्यामध्ये होणार्या वाहतूक कोंडीवरून नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.