ऑनलाईन अर्जाद्वारे जिल्हा परिषदेची घरपोच दाखले मिळण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. Pudhari News Network
ठाणे

Thane News | दाखले मिळवण्यासाठीचे हेलपाटे होणार बंद

ऑनलाईन अर्जाद्वारे जिल्हा परिषदेची घरपोच दाखले मिळण्याची सुविधा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : सध्याचे युग हे मोबाईल आणि तंत्रज्ञानाचे आहे. आता जवळपास सर्वच शासकीय आणि निमशासकीय कामे ऑनलाइन होत आहेत. शासनानेही नागरिकांच्या सोयीसाठी विविध शासकीय दस्तावेज ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता जन्मदाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंद दाखला यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाइन मिळवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

घरबसल्या मिळणार हे दाखले

  • जन्म नोंद दाखला

  • मृत्यू नोंद दाखला

  • विवाह नोंद दाखला

  • दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र

  • ग्रामपंचायत बाकी नसल्याचा दाखला

  • नमुना 8 चा उतारा

  • निराधार असल्याचा दाखला

  • महसूल विभागाचे निवडक दाखले

ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना ही सेवा अधिक सुलभ करण्यासाठी ठाणे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रयत्नातून ‘आदर्श आपले सरकार केंद्र’ हे नवे अ‍ॅप्लिकेशन सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिक घरबसल्या मोबाईलवरूनच कागदपत्रांसाठी अर्ज करू शकतात व त्यांचे दाखले थेट घरी मिळू शकतात. यामुळे नागरिकांची पायपीट वाचणार असून वेळ, पैशाची बचत होणार आहे.

घरपोच दाखला मिळवण्यासाठी ठराविक शुल्क

शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना वेळ आणि पैसे खर्च करावे लागतात. हे टाळण्यासाठी जिल्हा परिषदेकडून घरपोच दाखला वितरण सेवा सुरू करण्यात येत आहे. नागरिकांनी अ‍ॅप्लिकेशनद्वारे अर्ज केल्यानंतर जिल्हा परिषदेने करार केलेल्या कंपनीचा कर्मचारी हा दाखला नागरिकांच्या घरी आणून देईल. मात्र, ही सुविधा वापरण्यासाठी ठराविक वितरण शुल्क द्यावे लागेल.

15 दिवसांत सेवा सुरू होणार

‘आदर्श आपले सरकार केंद्र’ हे अ‍ॅप्लिकेशन पुढील 15 ते 20 दिवसांत नागरिकांसाठी सुरू होणार आहे. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांचे फेरे मारण्याची गरज भासणार नाही, तसेच वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे.

तक्रारींसाठी विशेष व्यवस्था

या सुविधेबाबत कोणत्याही अडचणी आल्यास नागरिकांना तक्रार नोंदणी कॉलम उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये तक्रार नोंदवल्यानंतर जिल्हा परिषद तातडीने कारवाई करेल. तसेच, ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक पैसे मागितल्यास नागरिक त्याचीही तक्रार अ‍ॅप्लिकेशनवर नोंदवू शकतील.

ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा

ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर आणि अंबरनाथ या पाच तालुक्यांत एकूण 431 ग्रामपंचायती आहेत. येथे मोठ्या संख्येने गाव आणि पाडे असल्याने नागरिकांना आवश्यक दाखले मिळवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. यामुळे वेळ आणि पैशाचा मोठा खर्च होतो. काही वेळा एका दाखल्यासाठी अनेकदा सरकारी कार्यालयांत फेर्‍या माराव्या लागतात. नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून हे अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT