कल्याण : टिटवाळा येथील पंधरा वर्षीय मुलगा आपल्या गिअरच्या सायकल सह खेळण्यासाठी रविवारी (दि.18) आपल्या घरातून निघून गेला होता. मात्र सायंकाळ झाली तरीही तो परतून न आल्याने त्याची शोधा शोध त्याच्या कुटुंबियांनी केली, मात्र त्याचा तपास लागला नाही. याबाबत कल्याण तालुका पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार सोमवारी करण्यात आली होती. मात्र टिटवाळ्यातील काळू नदीच्या प्रवाहात त्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळून आली.
तुषार पांडुरंग चोरघे असे या १५ वर्षीय नदीत बुडून मृत पावलेल्या मुलाचे नाव असून या दुर्दैवी घटनेने तो राहत असणाऱ्या परिसरात व्यक्त हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तुषार टिटवाळ्यात आपल्या परिवारासह वास्तव्यास होता. थरवानी परिसरातील संकुलानात आपल्या काकांच्या घरी जात असल्याचे
सांगत सोबत गियरची आपली सायकल तो घेऊन गेला होता. रविवारी (दि.18) दुपारी दोनच्या सुमारास गेलेला तुषार सायंकाळपर्यंत घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याची शोधाशोध सुरु केली. मात्र सोमवारी याबाबत सकाळी कल्याण तालुका पोलीस स्टेशन मध्ये मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.
मिसिंगची तक्रार दाखल केल्यानंतर कल्याण तालुका पोलिसांनी त्याची दुपारनंतर शोधा शोध सुरू केली. दुपारनंतर काळू नदीच्या प्रवाहात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळून आली. सदरचा मृतदेह हा तुषारचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. खेळण्यास गेलेल्या तुषारचा मृतदेह काळू नदीच्या प्रवाहात आढळून आल्याने पोलिसांनी याबाबत आकस्मित गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ या घटने संदर्भात अधिक तपास करीत आहेत.