पनवेल : कळंबोली सर्कलवर तेलाने भरलेला टँकर कंटेनरवर आदळल्यामळे पलटी झाला. या अपघातात ट्रक मधील तेल रस्त्यावर पडून स्कूटी घसरुन दुचाकीस्वार महिलेला मागून येणार्या एस टी बसने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. यावेळी मार्गावर चार ते पाच वाहने घसरून अपघात झाले.
महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब लागल्या रांगा
अग्निशमन जवानांकडून महामार्गावरील तेलाची सफाई
कळंबोली वाहतूक शाखेच्या हद्दीमध्ये शनिवारी सकाळी 06 ते 07 च्या दरम्यान एक क्वॉइल भरलेला ट्रक व दुसरा टँकरज्यामध्ये साबण शाम्पू बनविण्याचे कच्चे तेल असे दोन्ही ट्रक मुंब्रा वरून जेएनपीटी कडे जात असताना तेल भरलेल्या टँकर चालकाचे सर्कल या ठिकाणी आल्यानंतर नियंत्रण सुटल्याने सदर कंटेनर हा कॉईल च्या कंटेनर जाऊन धडकला व एका बाजूला पलटी झाला. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही परंतु लिक्विड तेल संपूर्णपणे रस्त्यावर पसरल्याने वाहनांच्या टायर द्वारे ते संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात पसरल्याने वाहने घसरून अपघात घडण्याच्या घटना घडल्या होत्या.
त्याचदरम्यान सदर लिक्विड हे पनवेल बाजूकडील लेनवरही पसरलेले असल्याने त्या ठिकाणी सकाळी 7.30 वा सुमारास एका स्कुटी चालक महिलेची दुचाकी घसरून अपघात झाला. तिला बसची ठोकर लागल्याने सदर महिला ही गंभीर जखमी झाली होती तिला पुढील उपचारासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठविण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. त्यानंतर कळंबोली सर्कल या ठिकाणी तेलामुळे वाहने घसरत असल्याने सिडकोच्या नवीन पनवेल , कळंबोली येथील फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले. रस्ता पाण्याने साफ करण्याचा प्रयत्न केला असता जास्तच प्रमाणात तेल पसरले, त्यामुळे काही काळ सर्व मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर जवळच्या दुकानातून 10 ते 12 गोणी ब्लिचींग पावडर आणून सर्कलचे सर्व बाजूस रस्त्यावर टाकण्यात आले. त्यामुळे वाहने घसरण्याचे प्रमाण कमी झाले व वाहतूक सुरळीत झाली आहे. यावेळी अग्निशमन दलाचे जवान पी के दरेकर, प्रफुल पाटील, जी पी गडगे, एस डी तांडेल, एस के म्हात्रे यानी शर्थीचे प्रयत्न करून रस्त्यावरील तेल साफ केले. कंटेनर चालकावर कळंबोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
महामार्ग फोमने धुवून काढल्यानंतर वाहतूक पुर्ववत झाली. या दरम्यान वाहतूक कोंडीतून पनवेलच्या दिशेने निघणारी वाहने खांदेश्वर उड्डाणपुलाच्या अलिकडे जात असताना १९ वर्षीय राजनंदिनी जाधव या दुचाकीस्वार तरुणीचा महाविद्यालयात जात असताना अपघाती मृत्यू झाला. राजनंदिनी चालवित असलेल्या दुचाकीच्या चाकांना महामार्गावरील तेल लागल्याने तीची दुचाकी उलटल्याची चर्चा होती. राजनंदिनी हीची दुचाकी उलटल्यानंतर तीच्या मेंदूला मार लागला. तीच्या डोक्यात हेल्मेट नव्हते. त्यामुळे रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने तीचा मृत्यू झाला. राजनंदिनी चालवित असलेली दुचाकी नेमकी कशामुळे उलटली याचा शोध खांदेश्वर पोलीस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रकांत लांडगे यांनी दिली.