पालघर ग्रामीण जिल्ह्यामध्ये नववी इयत्तेत प्रवेश न मिळाल्याने 1185 विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले जाण्याची चिन्हे आहेत. हे विद्यार्थी आठवी उत्तीर्ण झाले असून नववी प्रवेशापासून वंचित आहेत. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी डहाणू व तलासरी तालुक्यातील आहेत. शाळाबाह्य राहिलेल्या या मुलांमध्ये बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबातील आहेत, अशी माहिती मिळत आहे. (Out of stream of student learning)
शिक्षण विभागाने केलेल्या एका शोध मोहिमेअंतर्गत व सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. शिक्षण विभागाने दिलेली माहिती ही एक हजार 185 मुलांची असली तरी ही संख्या अधिक असण्याची शक्यता असून शिक्षण विभाग ही आकडेवारी लपवत असल्याचे आरोप केले जात आहेत. आठवी उत्तीर्ण होऊन नववीत जाणार्या विद्यार्थ्यांना जवळपास शाळा किंवा वर्ग उपलब्ध न झाल्याने हे विद्यार्थी नववीच्या शाळा प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत. पालघर जिल्ह्यात आठवी उत्तीर्ण होऊन नववीत गेलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्याने ते शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशावेळी मजुरी, नोकरी करून हे विद्यार्थी कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही मुलींची चक्क लग्न झाल्याचा दावा केला जात आहे. या प्रकारामुळे कुपोषणासारखा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
जिल्ह्यात सर्वाधिक शाळाबाह्य विद्यार्थी डहाणू व तलासरी तालुक्यात आहेत. शाळाबाह्य विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण मोठे आहे. शिक्षण विभागाचा कारभार या आकडेवारीत दिसून येत आहे. शैक्षणिक भवितव्य अधांतरी असलेली ही आदिवासी पिढीच नष्ट होत असल्याची सडकून टीका होत आहे.
आठवी उत्तीर्ण होऊन नववीच्या शाळेअभावी, वर्गाअभावी विद्यार्थाना प्रवेश घेता येत नव्हता. त्यासाठी जिल्हा परिषद शाळांना नववी व दहावीचे वर्ग संलग्न करण्यात आले आहेत. मात्र आठवी उत्तीर्ण होणार्या विद्यार्थी वर्गाची संख्या मोठी व नववी दहावीचे वर्ग त्या तुलनेत कमी पडू लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आठवी व नववीनंतर प्रवेशासाठी संघर्ष करावा लागतो. एखाद्या ओळखीने इतर शाळेत प्रवेश घेण्याची वेळ येते.
गेल्या तीन-चार वर्षांपासून पालघर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये नववी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा मुद्दा वारंवार उपस्थित होत आहे, मात्र त्यानंतरही या प्रश्नाकडे जातीने लक्ष देताना दिसत नाही.
2023-24 मध्ये पालघर जिल्ह्यात 8259 विद्यार्थी आठवी उत्तीर्ण झाले. 2024-25 च्या शैक्षणिक वर्षात 7074 विद्यार्थ्यांना नववी प्रवेश मिळाला. तर यावर्षी 1185 विद्यार्थी नववी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.
पालघर जिल्ह्यात गाव, तालुका, जिल्हा सोडून स्थलांतर झालेल्या मुलांचा आकडा शिक्षण विभागाकडे असतो मात्र ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात आहेत की नाही, याची कोणतीही माहिती शिक्षण विभागाकडे नसते.
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषतः डहाणू व तलासरी तालुक्यात विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे. नववीसाठी नवीन शाळा किंवा तुकडीवाढ हा पर्याय आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी याकडे विशेष लक्ष घालणे गरजेचे आहे.अॅड. काशिनाथ चौधरी, सदस्य, जि. प. पालघर.