शहरातील पालिकेचे जुन्या टाऊन हॉल इमारती मध्ये सुरू असलेले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय इमारत धोकादायक झाल्याने मागील वर्षभरापासून बंद आहे. परंतु वर्षभरात धोकादायक इमारत दुरुस्ती तर केली नाहीच पण वर्षभरात ते तात्पुरत्या स्वरूपात कोठे सुरू ही केले नाही त्यामुळे अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने हाल सुरू आहेत.
पालिका प्रशासनाने मागील कित्येक वर्षे या इमारत दुरुस्ती कडे दुर्लक्ष केल्याने नादुरुस्त ठिकाणी वाचनालय सुरू ठेवले होते. त्याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रशासनाने घाईघाईत या इमारती मधील वाचनालय बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र वाचनालय बंद केल्यानंतर वर्षभराच्या काळात पालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांना पर्यायी वाचनालय सुरु केले नाही. त्यामुळे यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परिक्षांसह शालेय परीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.
शहराच्या मंडई परिसरात मनपाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय 1991 मध्ये सुरू केले होते. परंतु पालिका प्रशासनाने या इमारतीच्या निगा व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले होते. या वाचनालयात संदर्भ ग्रंथ, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, स्पर्धा परीक्षांसाठी उपायुक्त पुस्तके अशी सुमारे 50 हजार पुस्तके होती. मात्र इमारत नादुरुस्त व गळकी झाल्याने या वाचनालयातील असंख्ये पुस्तके देखील खराब झाली होती.
शहरातील विद्यार्थ्यांसह स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे असंख्य विद्यार्थी अभ्यासासाठी या वाचनालयात येत होते, सध्या वाचनालय बंद असल्याने विद्याथ्यार्ंची प्रचंड गैरसोय होत आहे. वाचनालय बंद असून सध्या वाचनालयासाठी पर्यायी व्यवस्था केली नाही. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथील पुस्तके व कर्मचारी शहरतील मनपाच्या अखत्यारीत असलेल्या इतर वाचनालयात स्थलांतरित करण्यात आली असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात येत आहे.