ठाण्यातील वर्तकनगरमधील धोकादायक इमारत pudhari news network
ठाणे

Thane News | रिकामी धोकादायक इमारत ठरतेय ठाणेकरांसाठी जीवघेणी

Thane : वर्तकनगरमधील इमारत खाली करूनही न पाडल्याने परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : शहरातील अतिधोकादायक इमारती खाली करण्याचे काम महापालिकेच्या वतीने तत्काळ केले जाते. मात्र अशा धोकादायक इमारती त्वरीत जमीनदोस्त न केल्यामुळे परिसरातील लोकांचा जीव धोक्यात आला आहे.

ठाण्यातील वर्तकनगरमधील इमारत क्र. 51, 52, 53 यांमध्ये राहणारे पोलीस कर्मचारी यांचे काही वर्षांपूर्वीच इमारत धोकादायक झाल्यामुळे स्थलांतर करण्यात आले. मात्र ही इमारत धोकादायक असूनही जमीनदोस्त न केल्यामुळे गेल्या आठवड्यात या इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळे परिसरातील नागरिकांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना घडली. इमारत कोसळून मोठी दुर्घटना टाळण्यासाठी वेळीच सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारत जमीनदोस्त करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस (महाराष्ट्र राज्य) व ओवळा माजिवडा विधानसभा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी निवेदनाद्वारे केली.

धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. यापूर्वी अशा घटना घडल्या असून त्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच रिकाम्या करण्यात आलेल्या धोकादायक इमारतीचे बांधकाम त्वरीत तोडण्यात यावेत. ठाण्यातील वर्तकनगर येथील इमारत क्र. 51, 52, 53 यांमध्ये राहणारे पोलीस कर्मचारी यांचे काही वर्षांपूर्वीच इमारत धोकादायक झाल्यामुळे स्थलांतर करण्यात आलेले आहे.

इमारत पाडण्याची मागणी

मागील आठवड्यात या इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळे रस्त्यावरील वाहनांचे नुकसान झालेले आहे. तसेच लगतच्या रस्त्यावरून ये-जा करणारे रहिवाशी देखील किरकोळ जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही महिन्यापूर्वी इमारतीत आग लागली होती. त्यावेळी अग्निशमन विभागाने येऊन आग आटोक्यात आणली. वर्तकनगर पोलीस स्टेशन इमारती लगत असल्यामुळे तेथे येणारे नागरिक तसेच पोलीस कर्मचारी यांचा जीव देखील धोक्यात येऊ शकतो. भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये, याकरिता या इमारतींचे तोडकाम करण्याचे तात्काळ आदेश द्यावेत अशी मागणी पाचंगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे.

पुर्नविकासाकरिता विकासक महापालिकेच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून इमारती धोकादायक ठरवतात मात्र वर्तकनगर मधील इमारत क्र. 51,52,53 या 2018 मध्ये धोकादायक असल्यामुळे रिकाम्या करण्यात आल्या होत्या तरीही जमीनदोस्त करण्यात न आल्यामुळे ये-जा करणार्‍या आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या तसेच मध्यभागी असलेल्या पोलीस स्टेशन मधील कर्मचार्‍यांच्या जीवावर बेतू नये याकरिता तात्काळ तोडकाम करावे.
संदीप पाचंगे, सरचिटणीस मनविसे, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT