ठाणे : महापालिका शाळांमधील वर्गखोल्या डिजिटल करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी शिंदे गटाने बहुमताच्या जोरावर मंजूर केला खरा. मात्र, याआधी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या 'डिजिटल वर्गखोल्या' अत्यंत दुरवस्था असून, अनेक शाळेमध्ये इंटरनेटचा पत्ता नाही, डिजिटल बोर्ड धुळीत पडले आहेत तर शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची शिवसेना (उबाठा) पक्षाने पोलखोल केल्यांनतर स्मार्ट क्लासरूमची स्वप्न दाखवणाऱ्या ठाणे पालिकेच्या डिजिटल शाळांचा फुगा फुटला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या एकूण ६९ शाळा इमारतीमध्ये ६३७ वर्गखोल्या आहेत. शाळेतील प्रत्येक वर्ग हा डिजीटल असावा या अनुषगांने पहिल्या टप्प्यात ठाणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या १०० शाळांतील २०० वर्ग हे डिजिटल करण्यात आलेल्या आहेत. तसेच सीएसआर फंडातून १०० वर्ग खोल्या डिजीटल करण्यात आले आहेत.
उर्वरीत १८२ वर्ग हे टप्या टप्याने डिजिटल करण्यात येणार आहेत. दरम्यान, वर्गखोल्या डिजिटल केल्याचा डांगोरा पिटला जात असताना, प्रत्यक्ष वर्गात साधा वायफाय सेवा उपलब्ध नाही, इंटरनेटअभावी कोट्यवधींचे डिजिटल बोर्ड केवळ शोभेच्या वस्तू बनले असल्याचा आरोप शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केला. कोट्यवधींचा निधी खर्च करण्याची गरज काय? संताप व्यक्त करीत पालिकेच्या धोरणावर दिघे यांनी का केली.
काय आहेत मुख्य मागण्या?
शाळांमधील सीसीटीव्ही यंत्रणा बंद अवस्थेत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ सुरू आहे. डिजिटल शाळांच्या नावाखाली झालेल्या खर्चाचे तत्काळ थर्ड पार्टी ऑडिट करण्यात यावे. तंत्रज्ञानाचा आव आणण्यापूर्वी शाळांमध्ये पुरेसे शिक्षक, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि कार्यरत इंटरनेट या प्राथमिक सुविधा आधी पूर्ण कराव्यात. ठाणे महानगरपालिकेचा कारभार आणि बजेटचा वापर कसा होतो हे प्रत्येक ठाणेकराला समजले पाहिजे. यासाठी पालिकेची महासभेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे.
ठाणेकरांच्या करातून जमा होणाऱ्या पैशांची अशी उधळपट्टी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी चाललेला खेळ शिवसेना खपवून घेणार नाही. प्रशासनाने आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा केली नाही तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. -केदार दिघे, जिल्हाप्रमुख ठाणे.