फास्टॅगमुळे टोल कर्मचारी व वाहनचालक यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद होत असून टोलनाक्यांवर फास्टॅग मुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत आहेत. मुंबई-नाशिक या महामार्गावरील पडघा टोल नाक्यावर फास्टॅगच्या माध्यमातून जबरदस्ती टोलवसुली करून येथील कर्मचारी टोलचा झोल करताना आढळत आहेत. त्यामुळे कल्याण, भिवंडी आणि आसपासच्या कमी अंतरावर राहणाऱ्या चारचाकी वाहनचालकांना याचा आर्थिक भूदंड सहन करावा लागत आहे.
या मार्गावर नाशिकपर्यंत जाताना तीन टोल नाके लागतात. यातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या आधिपत्याखालील मुलुंड येथे टोल भरल्यास पुढे पडघा (अरुंजली) येथे वाहनचालकांना टोल भरावा लागतो. ज्यांनी पडघा येथे टोल भरला आहे त्यांना त्यानंतर घोटी येथील टोलनाक्यावर टोल भरावा लागत नाही. संपूर्ण प्रवासात टोलचा झोल होतो तो पडघा टोल नाक्यावर. नाशिकपर्यंत जाण्यासाठी १४० रुपयांचा टोल हे कर्मचारी घेतात. मात्र हा टोल घेताना काही वाहनचालकांच्या अज्ञानाचा फायदा घेत असतात.
पडघा टोल नाक्यावर स्थानिक वाहन चालकांना टोल मध्ये सुट आहे. मात्र या टोल नाक्यावर फास्टॅग काढून घरी ठेवले पाहिजे. फास्टॅग गाडीत असेल तरी आपल्या सिस्टममुळे तो स्कॅन होतो आणि प्रवाशांचे पैसे कापले जातात. आणि आम्ही टोल वसुली करतो, रस्ते खराब असतील तर ते नॅशनल हायवे यांच्याकडे तक्रार नोंदवली गेली पाहिजे.बाबूभाई शेख, पडघा टोल नाका
यामध्ये मोठ्या प्रमाणावर कल्याण, भिवंडी आणि आसपासच्या ठिकाणावरून आलेल्या चारचाकी वाहनचालकांना टार्गेट केले जाते. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या परिपत्रकानुसार ठाणे जिल्ह्यात रजिस्टर झालेल्या अथवा टोलनाक्यापासून २० किमी पर्यंतच्या अंतरावर राहणाऱ्या वाहनचालकांना सवलतीच्या दरात टोल देणे सक्तीचे आहे. मात्र एमईपी कंपनीचे कर्मचारी हा नियम पायदळी तुडवून सक्तीने कल्याण, भिवंडी आणि आसपासच्या ठिकाणावरून आलेल्या अनेक वाहन चालकांकडून टोल वसूल करतात.
एकीकडे खराब रस्ते आणि दुसरीकडे पडघा टोलनाक्यावर फास्टॅगमुळे वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहन चालक हैराण होत आहेत. मात्र टोल कंपनी केंद्र शासनाचे निर्देश पुढे करून नागरिकांकडून टोल वसूली करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे. मुंबई नाशिक महामार्गावर असलेल्या पडघा टोलनाक्यावर गणेश उत्सवादरम्यान नाशिककडे जाणाऱ्या व तेथून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची गर्दी जास्त असते. तर इतर दिवसांपेक्षा सुट्टीच्या दिवशी या दोन टोलनाक्यावर वाहनांची मोठी गर्दी असते. फास्टॅगमुले स्थानिक वाहन चालकांना या टोल नाक्यावरून १४० रुपयाचा भूदंड बसत आहे. मात्र स्थानिक नागरिकांचा टोल भरण्यास विरोध असल्याने टोलनाक्यावर अनेकवेळा वाद होतात.दिगंबर भोईर, स्थानिक वाहन चालक