Free Bike Riders for Students
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात वेगवेगळ्या कामांसाठी रस्त्यांचे खोदकाम आणि त्यामुळे होणारा वाहतूक कोंडीचा फटका, याचा त्रास वाहन चालकांना बसत आहे. दहावी, बारावीचे परीक्षार्थी देखील यात अडकतील, याची भीती परीक्षार्थींसह पालकांच्या मनात असल्याने वेळेत परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना पोहोचण्यासाठी ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी परीक्षार्थींसाठी मोठा दिलासा दिला आहे. परीक्षा केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी १२ बाईक रायडर्स तैनात करण्यात आले आहेत.
परीक्षार्थींचा प्रवास सुकर व्हावा, ते कोठेही वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यास त्यांना तात्काळ मदत मिळून परिक्षा केंद्र गाठता यावे यासाठी कल्याण-डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने विशेष १२ बाईक रायडर्सची सुविधा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला असून या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्या त्या भागातील रायडर्स विद्यार्थ्यांना तेथून घेऊन परिक्षा केंद्रावर सोडतील, असे डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख श्रीराम पाटील यांनी सांगितले.
दहावी/बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर आणि सुरळीत व्हावा, याकरिता कल्याण-डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने विशेष रायडर्सची नेमणूक करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि वाहनचालकांना आवाहन केले आहे की, परीक्षेच्या वेळेस वाहनांची गर्दी टाळावी, शाळा-कॉलेज परीसरात वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, हॉर्नचा अनावश्यक वापर टाळावा. विद्यार्थ्यांनी वेळेआधी परीक्षा केंद्र गाठावे आणि वाहतुकीच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन घरून लवकर निघावे, असे आवाहन डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख श्रीराम पाटील यांनी केले आहे.
डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख श्रीराम पाटील यांनी सांगितले, कल्याण आणि डोंबिवली शहरात परीक्षा केंद्रांच्या आसपास वाहतूक सुरळीत रहावी म्हणून काही प्रमुख मार्गांवर वाहतूक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना आणि पालकांना मदतीचा हात देण्यासाठी हे अंमलदार विशिष्ट मार्गावर वाहतूक नियमन करतील. आवश्यकतेनुसार रहदारी नियंत्रणात ठेवतील. तसेच कल्याण-डोंबिवलीतील परीक्षा केंद्र आणि त्याभोवतालच्या रस्त्यांवर वाहतूक नियंत्रण वअंमलदार तैनात असतील. या विशेष नियोजनामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडी वाहनांची गर्दी किंवा अन्य अडथळे यांचा सामना करावा लागणार नाही.
कल्याण आणि डोंबिवली शहर वाहतूक उपविभागाच्या परिक्षेत्रात दहावीच्या लेखी परीक्षा २० फेब्रुवारीपासून आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. परिक्षार्थीचा प्रवास सुकर व्हावा, ते कोठेही वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यास त्यांना तात्काळ मदत मिळून परिक्षा केंद्र गाठता यावे, यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीने विशेष बाईक रायडर्सची सुविधा देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला असून यावर संपर्क साधल्यास त्या त्या भागातील रायडर्स विद्यार्थ्यांना तेथून घेऊन परिक्षा केंद्रावर सोडतील.
कल्याणमध्ये ४, डोंबिवलीमध्ये ४ आणि शिळफाट्याला ४ असे एकूण १२ रायडर्स विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी तत्पर असणार आहेत. ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक रायडर्स संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या शहरात कार्यरत असतील. कल्याण-डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण कक्षाशी 8655654184 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी अधिकारी तथा डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख श्रीराम पाटील यांनी केले आहे.