ठाणे : घोडबंदर येथील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला भाईंदरपाडा उड्डाणपूलाचे बुधवारी (दि. 14) या दिवशी लोकार्पण करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उड्डाणपूलाचे उद्धघाटन व लोकार्पण करण्यात आले आहे.
भाईंदरपाडा उड्डाणपूलामुळे वाहतुक कोंडीतून नागरिकांना मोठा दिसाला मिळणार आहे. तसेच परिसरातील नागरिकांसाठी उड्डाणपूलाखाली भुयारी मार्ग बांधला आहे. त्यामुळे अपघातावर आणि बेशिस्त वाहतुकीवर आळा बसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हा पूल बांधून पूर्ण झाला होता. परंतु लोकार्पण होऊ न शकल्याने पूल सुरू झाला नव्हता.
ठाणे, भिवंडी, मुंबई आणि नवी मुंबई या शहरातून बोरीवली, वसई, विरार आणि गुजरातच्या दिशेने हजारो वाहने वाहतुक करतात. तसेच वसई भागातील नोकरदार देखील घोडबंदर रस्ते मार्गे ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने येत असतो. गेल्याकाही वर्षांपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घोडबंदर मार्गावर वडाळा घाटकोपर- कासारवडली आणि पुढे गायमुख या 'मेट्रो चार' आणि 'चार अ' मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते, मुख्य रस्त्यांलगत आणि दुभाजकांवर ठिकठिकाणी मार्गावरोधक उभारले आहेत. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर होतो. घोडबंदर मार्गावर सध्या चितळसर मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ भागात उड्डाणपूल आहेत. परंतु वाहनांचा भार आणि अरुंद रस्ते यामुळे घोडबंदरवरील वाहतुक नेहमी संथ असते. घोडबंदर मार्गावरील भाईंदर पाडा परिसरात लोकवस्ती वाढली आहे. तसेच या भागात आणखी एक उड्डाणपूल निर्माणाचे काम एमएमआरडीएने सुरु केले होते. या उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले आहे. हा उड्डाणपूल बुधवारी (दि.14) रोजी पासून नागरिकांसाठी सुरु करण्यात आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पूलाचे लोकार्पण झाले आहे. यावेळी खासदार नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते
उड्डाणपूल सुरु झाल्यामुळे भाईंदरपाडा, नागलाबंदर, गायमुख, कासारवडवली भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उड्डाणपूलाखालून दोन भुयारी मार्ग जातात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी उड्डाणपूलाखालून वाहतुक करण्यास किंवा मार्ग ओलांडता येणार आहे. त्यामुळे विरुद्ध दिशेने होणाऱ्या बेशिस्त वाहतुकीला आळा बसणार आहे.