विरार : मुंबई-अहमदाबाद महामार्गा जवळील वर्सावे येथे घोडागाडी शर्यत आयोजित करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्राण्यांसाठी काम करणार्या पेटा संस्थेने दिलेल्या तक्रारीनुसार काशिगाव पोलिसांनी कारवाई करून 6 घोड्यांची सुटका केली आणि 3 जणांना अटक करण्यात आली आहे.
वर्सावे पुलावर मध्यरात्री घोडागाडी शर्यत होणार असल्याची माहिती पेटा (पिपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ निमल) या प्राण्यांसाठी काम करणार्या संस्थेने मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांना दिली होती. त्यानुसार मध्यरात्री काशिगाव पोलिसांनी या वरसावे नाका परिसरात गस्त घातली होती. रात्री साडेबाराच्या सुमारास काही तरुणांचा गट घोडागाडी शर्यत करत असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने त्यांना अडवून ताब्यात घेतले आणि सहा घोड्यांची सुटका केली.
या कारवाईत ओवीन डिमेलो, रन्सी कालतील आणि बेनी परेरा या तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान ही घोडागाडी शर्यत लावून प्राण्यांना क्रूर वागणूक देणे, सार्वजनिक रहदारीस अडथळा आणल्याबद्दल भारतीय न्याय दंडसंहितेच्या कलम 291, 281, 125, 3(5) तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 च्या कलम 11(1) (अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घोडागाडी शर्यत आयोजित करणारे आरोपी हे भाईंदरच्या उत्तन गाव परिसरात राहणारे असून उरूस यात्रेच्या निमित्ताने त्यांनी ही बेकायदेशीर घोडागाडी शर्यत लावली होती. पोलिसांनी या कारवाईत 6 घोड्यांची सुटका केली असून त्यांना वसईच्या सकवार येथील पशू आश्रमात ठेवण्यात आले आहे.