Thane Dahi Handi News
ठाणे : "पूर्वी मुंबईतील गोविंदा पथकांचे दहीहंडीतील वर्चस्व पाहायला मिळत होते. मात्र, आता ठाण्यातील गोविंदा पथकांनीही नऊ थरांचा वसा घेतला असून, अनेक पथके नऊ थर रचून मुंबईतील पथकांचे विक्रम मोडीत काढत आहेत. खोपटचा राजा, रामनगरचा राजा आणि ठाण्याचा राजा यासारख्या गोविंदा पथकांनी ठाण्याची दहीहंडीची संस्कृती जपण्याबरोबरच ती पुढे नेण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता दहीहंडी उत्सवात केवळ मुंबईचा बोलबाला न राहता ठाण्याचाही थरथराट पाहायला मिळेल" असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने आयोजित ‘गोकुळ दहीहंडी २०२६’ उत्सवात ते बोलत होते. ठाणे महापालिकेचे उपमहापौर आणि भाजप नेते कृष्णा दादू पाटील यांच्या पुढाकाराने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उत्सवात गोविंदा पथकांसाठी तब्बल ५५ लाख रुपयांची बक्षिसे आणि आकर्षक चषक ठेवण्यात आले आहेत.
यावेळी खोपटचा राजा गोविंदा पथकाने मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत नऊ थर यशस्वीपणे रचले. या कामगिरीबद्दल सरनाईक यांनी पथकाचे अभिनंदन केले. तसेच साचिनभोसले आणि समीर पेंढारे यांना शुभेच्छा दिल्या. ठाण्याची सांस्कृतिक परंपरा आणि दहीहंडीची ओळख पुढे नेण्याचे काम खोपटचा राजा गोविंदा पथक करत असल्याचे सांगत त्यांनी पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले.
‘गोकुळ दहीहंडी २०२६’ मध्ये पुरुष गोविंदा पथकांसाठी १० थर रचणाऱ्या पहिल्या पथकाला ११ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक १० थर रचणाऱ्या पथकाला ५ लाख ५५ हजार ५५५ रुपये मिळणार आहेत. नऊ थरांसाठी ५ लाख ५५ हजार ५५५ रुपये, त्यानंतर प्रत्येक नऊ थरांसाठी २ लाख २२ हजार २२२ रुपये, तर आठ थरांसाठी ५१ हजार रुपये आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
सात थरांसाठी १५ हजार, सहा थरांसाठी ९ हजार, पाच थरांसाठी ५ हजार आणि चार थरांसाठी ४ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. महिला गोविंदा पथकांसाठीही विशेष बक्षिसे जाहीर करण्यात आली असून, प्रथम सात थर रचणाऱ्या पथकाला १ लाख ११ हजार रुपये, त्यानंतर प्रत्येक सात थरांसाठी ५१ हजार, सहा थरांसाठी २५ हजार, पाच थरांसाठी १० हजार आणि चार थरांसाठी ५ हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
परंपरा, साहस आणि सामाजिक संदेश यांचा संगम साधत गोविंदा पथकांना प्रोत्साहन देणे आणि दहीहंडी उत्सवाचा उत्साह कायम ठेवणे, हा या आयोजनामागील उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.