ठाणे : मैत्रिणीला वारंवार ब्लॅकमेल करण्यार्यास समजवण्यास गेलेल्या तरुणात व ब्लॅकमेल करणार्यात वाद झाल्याने तरुणाने कोयत्याने वार करून ब्लॅकमेल करणार्या तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील कोपरी भागात घडली आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणास पोलिसांनी अटक केली असून त्याच्या मैत्रिणीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरातील चेंदनी कोळीवाडा येथे राहणारी 20 वर्षीय तरुणीची 28 एप्रिल 2024 मध्ये एका लग्न समारंभात स्वयंम सतीश परांजपे (राहणार - संचार सोसायटी, अष्टविनायक चौक, कोपरी, ठाणे) या तरुणा सोबत ओळख झाली होती. त्यानंतर या तरुणाने तरुणीस कारमध्ये बसवुन फिरायला जावू असे सांगुन, गुंगीचे औषध पाण्यामधे पाजुन स्वतःच्या घरी घेवुन गेला होता. त्यावेळी त्याने सदर तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढले होते. याच फोटोच्या आधारे तो तरुणीस वारंवार त्रास देत होता.
तसेच 'तू मला भेटायला ये' असे मेसेज करून तिस कायम ब्लॅकमेल करत होता. याबाबत तरुणीने तिचा मित्र मयुरेश नंदकुमार धुमाळ (24, राहणार - जांभळी नाका, ठाणे) यास सांगितली. त्यानंतर मयुरेश व तरुणी दोघेही शुक्रवारी सकाळी हे स्वयम परांजपे यास तू तिचे काढलेले फोटो डिलीट कर असे समजून सांगण्यास गेले. यावेळी तेथे स्वयंम परांजपे व मयुरेश धुमाळ यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात मयुरेश धुमाळ याने स्वयंम यास कोयत्याने डोक्यावर वार करुन त्याचा खून केला. घटनेची माहिती मिळताच कोपरी पोलिसांनी धाव घेऊन तरुण व त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतले. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.