ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाण्यात कुठल्याही महिलेला, मुलींवर अन्याय करण्याची कुणाची हिंमत नव्हती, जर कुणी तर दिघे हे त्यांच्या पद्धतीने उपाय करायचे. आता अक्षय शिंदे हा पोलिस एन्काऊंटरमध्ये मारला गेला आणि बदलापूरमधील त्या मुलींना न्याय मिळाला. हे कुणाच्या राज्यात झाले, त्याचे शिष्य असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि पोलिसांच्या पाठीवर आनंद दिघे वरून शाबासकी, कौतुकाची थाप मारत असतील, अशा भावना शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी व्यक्त केली.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाणे जिल्ह्यात महिलांवर अत्याचार सहन होत नव्हते जर कोणी केले तर आनंद दिघे स्टाईलने शिक्षा द्यायची. तशीच शिक्षा कुरकर्मा अक्षय शिंदे याला नियतीने दिलेली आहे. त्यामुळे आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थळावर जाऊन आम्ही त्यांना आदरांजली वाहली आणि आरोपी ठार झाल्यामुळे फटाके फोडून शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी विरोधी पक्षांच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. बदलापूर घटनेनंतर 30 बस भरून बदलापूर बंद करणारे आणि आरोपीला तात्काळ फाशी द्या, त्याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करणारे विरोधी पक्ष आता आरोपीच्या एन्काऊंटर नंतर विरोधात का भूमिका घेत आहेत? ते दुतोंडी सापासारखे असल्याची टीका केली.शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे पी ए राहिलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी 100 रुपयांच्या खंडणीसाठी ठाण्यातील मनसुख हिरेन यांची हत्या केली. तेव्हा कुठे तुम्ही होतात ? असा प्रश्नही केला.