ठाणे: ठाणे शहरात सायबर भामट्यांनी पुन्हा डोके वर काढले असून, गॅस बिल भरणे, शेअर मार्केटमधून भरघोस नफा, टेलिग्रामवरील ट्रेडिंग आणि आलिशान धार्मिक टूर अशा वेगवेगळ्या आमिषांना बळी पडलेल्या ठाणेकरांना तब्बल ४३ लाख ९५ हजार १३५ रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी चितळसर, कापूरबावडी आणि वर्तकनगर पोलिस ठाण्यांत सहा स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.चितळसर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांनुसार रमा भगवतीप्रसाद वैश्वव (४३) यांच्या पतीला अभिषेक चौधरी याने महानगर गॅस एजन्सीचा कर्मचारी असल्याचे सांगून थकीत बिलाच्या नावाखाली एपीके फाईल पाठवली.
फाईल उघडताच खात्यातून ५ लाख 69 हजार ४६९ रुपये गायब झाले. दुसऱ्या प्रकरणात धनश्री जयंत नाईक (५७) यांना काजा पर्गर याने लिंकद्वारे शेअर मार्केटमध्ये परताव्याचे आमिष दाखवत १० लाख ५६ हजार रुपये उकळले.
कापूरबावडी पोलिस पोलिस ठाण्यात दाखल २ गुन्ह्यांनुसार प्रमोद कैलासनाथ भारती (४२) यांना अविनाश कुमार याने शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत ७ लाख रुपये उकळले. तर धनश्री निखिल कासेगावकर (४०) यांना हर्ष व्ही याने टेलिग्राम लिंक पाठवून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ लाख २ हजार १६६ रुपये गंडवले.
वर्तकनगर पोलिस ठाण्यात दाखल २ गुन्ह्यांनुसार अनुप विनय झुणझुणवाला (४८) यांना अक्षय त्यागी याने स्वतःला हिमालया हेली सर्व्हिसेस प्रा. लि. चा प्रतिनिधी सांगत केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आणि बद्रीनाथसह हेलिकॉप्टर सुविधेची आलिशान धार्मिक टूर दाखवून ५ लाख १७ हजार ५०० रुपये उकळले.
पैसे घेतल्यानंतर टूरच झाली नाही. दुसऱ्या प्रकरणात कॅरेन फेराओनी गुंतवणुकीसाठी ९ लाख ५० हजार रुपये भरले. नफा तर मिळालाच नाही, उलट पैसे परत मागितल्यावर त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपमधूनच बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.