डोंबिवली : आजीच्या पेन्शनवर हक्क सांगणारे नातेवाईक बँकेतच भिडले. यावेळी झालेल्या वादातून तिघांनी मिळून एका दुसर्या गटातील दोघांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बँक ऑफ बडोद्याच्या कल्याणमधील शाखेत घडली आहे. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर हल्लेखोर त्रिकुट पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
कल्याणमध्ये राहणारे राहूल आणि विजय परमार यांची आजी सेवानिवृत्त झाली आहे. आजीच्या पेन्शनचे पैसे बँकेत जमा झाले आहेत. हे कळताच दोघे परमार बंधू आजीच्या पैशांसाठी बँकेत पोहोचले. बँकेतून पैसे काढण्यास गेले असता त्या ठिकाणी आजीच्या भावाची नातवंडे प्रथमेश, नाथा आणि मयूर चव्हाण त्या ठिकाणी पोहोचले. आजीच्या पैशांवर आमचा देखील हक्क आहे, आम्हाला पैसे हवेत, असा दावा तिघा नातवंडांनी केला. यावरून परमार आणि चव्हाण गटांमध्ये जोरदार राडा झाला. बँकेच्या कर्मचार्यांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना शांत करून बँकेच्या बाहेर काढले. मात्र बँकेच्या गेटवर पुन्हा या दोन्ही गटांटात भांडण जुंपले. भांडणा दरम्यान चव्हाण बंधूंनी सोबत आणलेल्या धारदार चाकूच्या सहाय्याने परमार बंधूंवर हल्ला केला. या हल्ल्यात राहूल आणि विजय परमार हे दोघे गंभीर जखमी झाले. हे पाहून तिघे हल्लेखोर पसार झाले.
घटनेची माहिती कळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड आणि त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळी असलेले सीसीटिव्ही कॅमेर्यातील फुटेज ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासचक्रांना वेग दिला आहे. आरोपींना शोधण्यासाठी तीन पथकांची नेमणूक केली असून लवकरात तिघेही आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी दिली. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.