ठाणे : गावदेवी भाजी मंडई आणि नौपाडा-कोपरी प्रभाग समिती कार्यालयाला लागलेल्या भीषण आगीत कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले ठाणे महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागाचे आरक्षक कै. काळू शंकर गाडेकर आणि अग्निशमन विभागाचे केंद्र अधिकारी कै. सागर सूर्यकांत शिंदे यांना शहीद दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला.
विशेष म्हणजे गावदेवी दुर्घटनेत शहीद झालेल्या अग्निशमन जवानांच्या कुटुंबीयांना नोकरी, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी देण्याचा ठराव मंजुर करण्यात आला. तसेच सभागृह नेते हणमंत जगदाळे आणि राष्ट्रवादी (अजित पवार) चे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी पुढील पाच वर्षे नगरसेवक मानधन देण्याचा निर्णयही यावेळी जाहीर केला.
शुक्रवारी झालेल्या महासभेत गावदेवी आगीच्या दुर्घटनेच्या अनुषंगांने पाच लक्षवेधी मांडण्यात आल्या. यावर तब्बल ७ तासांच्या आसपास प्रदीर्घ चर्चा झाली. गावदेवी मंडईतील भीषण आग दुर्घटनेने ठाणे महापालिकेच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या. अग्निशमन दलातील रिक्त पदे तातडीने भरणे, शहरातील सर्व इमारतींचे फायर ऑडिट करणे आणि दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.
लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान नगरसेवक भरत चव्हाण, संजय वाघुले, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, नजीब मुल्ला आदींसह ३० हून अधिक नगरसेवकांनी सहभाग घेतला. गावदेवी मंडईतील अनधिकृत गाळे, व्यवसायातील बदल आणि स्थावर मालमत्ता विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजी मंडईसाठी मंजूर झालेल्या गाळ्यांमध्ये कपड्यांचा व्यवसाय सुरू होण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
अग्निशमन विभागात मनुष्यबळाची मोठी कमतरता असून सुमारे २५ ते २७ लाख लोकसंख्येसाठी अवघे १४६ कर्मचारी कार्यरत असल्याचा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला. शहराला किमान १४ अग्निशमन केंद्रांची गरज असताना केवळ आठ केंद्रे कार्यरत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. फायर ऑडिट, उपकरणांची तपासणी आणि अग्निसुरक्षा उपाययोजनांतील ढिसाळपणावरही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, शिंदे सेनेचे गटनेते पवन कदम यांनी या दुर्घटनेत शहीद झालेल्या दोघांना शहीद दर्जा देण्याचा ठराव मंजुर करण्यात यावा अशी भुमिका मांडली.
गावदेवी दुर्घटनेत शहीद झालेल्या अग्निशमन जवानांच्या कुटुंबीयांना नोकरी, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि इतर सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यावर एकमत झाले. याशिवाय अग्निशमन दल सक्षक्त आणि मजबुत करण्यासाठी त्यांना सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबर रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी अशी मागणी नजीब मुल्ला यांनी केली.
पालिका सभागृहातच फायर सिस्टम नाही
मंडईच्या आगीच्या पार्श्वभूमीवर मुद्दे उपस्थित होत असतांना राष्ट्रवादी (शरद पवार) चे नगरसेवक सुधीर भगत यांनी गंभीर मुद्याला हात घालत, आपण ज्या सभागृहात ही चर्चा करीत आहोत, त्या ठिकाणीच अनिशमनची यंत्रणा नसल्याचे सांगितले. तसेच कोणत्याही प्रकारची परवानगी या सभागृहासाठी घेण्यात आली नसल्याचा दावा केला.