डोंबिवली: ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी सद्या राजकीय घडामोडींना सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, ते दरे गावात जाऊन काय बसले. शेवटी भाजपा सांगेल तेच त्यांना करायचे आहे. ईव्हीएम मुद्द्यावरून लक्ष हटविण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा संशय येत आहे.
खरोखर जर का ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असेल तर तो सिद्ध करून दाखवावा, असे आवाहन वजा परखड मत मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले. यावर शिंदेच्या शिवसेनेकडून प्रतिक्रिया देताना कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी विरोधात लढले म्हणून आकस असू शकतो, असे सांगून आम्ही ठणक्यात निवडून आलो आहोत, त्यामुळे ठणकावूनच बोलणार, असे राजू पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिले.
आमदार विश्वनाथ भोईर म्हणाले, राजू पाटील जिंकले असते तर त्यांनी ईव्हीएमचा विषय घेतला असता का ? नसता घेतला. ते पराभूत झाले म्हणून त्यांनी हा विषय घेतला आहे. लोकसभा आणि विधानसभेची गणित वेगळी असतात. ईव्हीएमचा विषय असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखवावा, असे आव्हान देणाऱ्या राजू पाटील यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असेही आमदार भोईर म्हणाले.
ईव्हीएमच्या मुद्द्यावर बोलताना राजू पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर तांत्रिक माहिती विशद केली. ईव्हीएममध्ये घोटाळे झाले आहेत. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा संशय येत आहे. जो निकाल लागला तो आपण स्वीकारला जरी असला तरी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 65 हजार मतदान वाढले. 66 हजार मतांनी शिंदे गटाचे राजेश मोरे विजयी झाले. वाढलेले सगळेच मतदान मोरे यांनाच मिळाले का ? असा सवाल राजू पाटील यांनी केला. निवडणूक आयोगाच्या स्थानिक कारभारावर बोलताना एकूणच सारा प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप करत व्हीव्हीपॅटच्या 17 मशीनमधील मतांची फेरमोजणी करण्याकरिता आठ लाख रूपये भरल्याचे पाटील यांनी सांगितले.