कसारा : शहापूरजवळ समृद्धी महामार्गावरून गावांना जाण्यासाठी बनविलेल्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला कोणतीही बाधा येऊ नये म्हणून या महामार्गावर गावागावांना जाण्यासाठी वेगळे रस्ते व ब्रिज बसविण्यात आले आहेत. मात्र याच ब्रिजला भगदाड पडल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षभरापासून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव काही ना काही घटना घडत आहेत. शहापूर तालुक्यातून जाणार्या शेरे - बावघर - शेंद्रूण गावांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गावर बनविण्यात आलेल्या या ब्रिजला मोठे भगदाड पडल्याने समृद्धी महामार्गावरून बनवण्यात आलेल्या ब्रिजवरून गावागावात जाण्यासाठी वाहतूक अद्याप सुरू केली नाही, तोच शेरे गावाजवळील ब्रिजला मोठा भगदाड पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर केलेल्या निकृष्ट दर्जाचे कामाचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.