ठाणे: पुढारी वृत्तसेवा : महविजय २०२४ चा नारा देत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रशिक्षण वर्ग आज भिवंडीत सुरू झाले. या कार्यशाळेला केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यमंत्री कपिल पाटील, रावसाहेब दानवे, भारती पवार, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे खासदार, आमदार, जिल्हा अध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधींसह प्रमुख नेते उपस्थित आहेत.
भिवंडी येथील एका रिसॉर्टमध्ये प्रदेश भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर सुरू झाले आहे. या शिबिरात पक्षाच्या गाण्याचे अनावरण झाले. शिबिराची प्रस्तावना केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनी केली. त्यानंतर उद्घाटनपर भाषण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी.टी.रवी यांनी केले. राज्यातील बदलते राजकारण आणि घडामोडी यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी कसा सामना करावा, याचे मार्गदर्शन यावेळी केले.
यावेळी श्रीकांत भारती यांनी महाविजय २०२४ या विषयावर पदाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करीत कामाला लागण्याचे आवाहन केले. आमदार प्रवीण दरेकर यांनी मोदी यांचे ९ वर्ष पूर्तीनिमित्त महाजनसंपर्क अभियान, कृपाशंकर सिंह यांनी विस्तारक योजना, अरविंद पाटील यांनी समर्थ बूथ या विषयावर मांडणी केली. सरल अॅप बाबत सुमंत घैसास आणि युवा मोर्चा काय करणार आहे, यावर प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर यांनी सांगितले.
महायुतीच्या विजयात महिला कार्यकर्त्यांनी कशी आणि कोणती भूमिका घ्यायची आहे, याचे मार्गदर्शन महिला आघाडी प्रमुख चित्रा वाघ यांनी केले. सोशल मीडियावर सुरू असलेल्या वॉर बाबत श्वेता शालिनी आणि प्रसार माध्यमांशी कसे बोलावे, कशी भूमिका मांडवी यावर प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सविस्तर मांडणी करून कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले.