डोंबिवली/सापाड : बदलापूरमध्ये झालेल्या चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेले शाळेचे संस्थाचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी 25 हजार रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर पोलिसांनी बुधवारी शाळेच्या संस्थाचालकांना अटक केली होती. मात्र, आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. बदलापूर बाल लैंगिक अत्याचार व अक्षय शिंदे प्रकरणातील शाळेच्या ट्रस्टींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. त्यांसह, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनादेखील 25 हजारांच्या जात मुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्ररणी दाखल दोन्ही गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सेम सेक्शन असल्याने आज जास्त युक्तिवाद न करता, कालच्या जामीनाच्या निर्णयाप्रमाणे न्यायालयाकडून आज दोघांनाही जामीन मिळाला आहे. न्यायलयाने पोलिसांना फटकारल्यानंतर कर्जत येथून पोलिसांनी शाळेच्या दोन्ही ट्रस्टींना अटक केली होती.
याप्रकरणी आरोपी हे दोन गुन्ह्यांमध्ये आरोपी होते. काल एका गुन्ह्यात अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाला. दरम्यान, पोलिसांनी परत दुसर्या गुन्ह्यात ताबा मागितला होता. त्यानंतर, 351 सीआरमध्ये पोलिसांना ताबा देण्यात आला. मात्र, पोलिसांनी आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दुसर्या गुन्ह्यातही जामीन मंजूर केला आहे. मात्र अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी शाळेच्या ट्रस्टीला जामीन मिळाल्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती दिली.