भिवंडी : कांदिवली मुंबई येथे राहणार्या एका विवाहितेचा घर घेण्यासाठी माहेरहून पैसे व सोने आणले नसल्याच्या रागातून पत्नीस मारहाण करीत गळा आवळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटने प्रकरणी पोलीस स्थानकात पती व जाऊबाई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चारकोप कांदिवली परिसरात घडलेल्या घटनेत विवाहिता ही पती सर्वेश व जाऊबाई आकांक्षा यांच्यासोबत राहत असताना 5 सप्टेंबर रोजी पती सर्वेश यांचे घर घेण्यासाठी पत्नीकडे वडिलांकडून पैसे व सोन्याचे दागिने घेवून यावेत या कारणावरून भांडण झाले.
यावेळी पतीने पत्नीस हाताच्या चापटीने व लाथाबुक्याने मारहाण करून व गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. तर जाऊबाईने शिवीगाळी करून शारीरिक व मानसिक छळ केला. या मारहाणीनंतर पीडित विवाहिता ही काल्हेर येथील हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल झाली असताना तिने याबाबत नारपोली पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पती सर्वेश व जाऊबाई आकांक्षा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये वर्ग केला आहे.
विवाहितेने घर घेण्यासाठी सोन्याचे दागिने आणि पैसे न आणल्याच्या कारणास्तव सासरच्या माणसांनी विवाहितेचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा केलेला प्रयत्न पाहता समाजात स्त्रियांचे छळ होण्याचे असे प्रकार वाढतच आहेत. स्त्रियांवरील छळ थांबणार केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.