ठाणे : पशुगणनेला दि. 25 नोव्हेंबरपासून ठाणे जिल्ह्यात प्रारंभ होणार आहे. दि. 28 फेब्रवारी पर्यंत ही मोहीम चालणार आहे. तीन हजार कुटुंबामागे एका प्रगणकाची नियुक्ती केली आहे. पशुगणनेमुळे पशुसंवर्धन विभागाला योजनांची अंमलबजावणी करणे, निधीची उपलब्धता करणे सोयीचे ठरणार आहे.
पशुसंवर्धन विभागाकडुन दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. जनगणनेच्या धर्तीवरच ही मोहीम राबवली जाते. मागील पशुगणना 2019 मध्ये झाली होती. वास्तविक 2017 मध्ये पशुगणना होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्यासाठी दोन वर्षाचा विलंब झाला होता. यंदाची पशुगणना 25 नोव्हेंबरपासून सुरु केली जाणार आहे. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाकडून तयारी केली जात आहे. पशुगणनेसाठी प्रगणकांची नेमणुक केली आहे. त्यांचे प्रशिक्षण पुर्ण झाले आहे.
पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांची या कामासाठी नियुक्ती केली आहे. या मेहीमेत गायवर्ग, म्हैसवर्ग, शेळी- मेंढी, अश्व, वराह यांची गणना केली जाणार आहे. पशुगणनेमुळे जनावरांची नेमकी संख्या स्पष्ट होते. त्यानुसार शासनाकडून धोरण, योजना आखल्या जातात. निधीची उपलब्धता केली जाते, शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे. त्यानुसार लसीकरणासाठी औषधांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आपल्याकडील जनावरांची खरी माहिती पशुपालकांनी द्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशसंवर्धन उपआयुक्त डॉ. वल्लभ जोशी, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर यांनी केले.
ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी एकूण 72 प्रगनक व 14 सुपरवायझर नेमण्यात आले तर शहरी भागासाठी 389 प्रगनक व 47 पर्यवेक्षक नेमण्यात आलेले आहेत. प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांनी ठाणे जिल्ह्याचा आढावा घेऊन पशुगणनेच्या तयारी बद्दल मार्गदर्शन केले आहे. पाच वर्षापुर्वी पशुगणना झाली होती. त्यामुळे त्यावेळी प्रगणकांना टॅब दिले होते. त्यावर माहिती भरुन घेतली होती आता प्रगणकांना स्वतःचे मोबाईल वापरावे लागणार आहेत. केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या सॉफ्टवेअरवर पशुधनाची माहिती भरावी लागणार आहे. प्रगणकांना मानधन आणि मोबाईल वापराचा वेगळा मोबदला दिला जाणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.