डोंबिवली : निसर्ग, भूतदया, पर्यावरणाचा समतोल, आदींचा काडीमात्र संबंध नसलेल्या निसर्गवैरींचे उपद्व्याप अजूनही सुरूच असल्याचे पश्चिम डोंबिवलीतील मोठागाव-माणकोली उड्डाणपूल भागात दिसून येते.
शहरातील पुनर्विकासासाठी तोडलेल्या इमारतींचा मलबा (डेब्रिज) टाकून खाडी बुजविण्याचे प्रयत्न भूमाफियांकडून सुरू आहेत. एकीकडे रात्रीच्या वेळेत हा मलबा गेल्या काही महिन्यांपासून रात्रीच्या वेळेत खाडी किनारी आणून टाकला जात असल्याच्या तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या. दुसरीकडे या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्या निद्रिस्त सरकारी यंत्रणांना निसर्गप्रेमींचे आव्हान दिले आहे.
रात्रीच्या सुमारास डेब्रिजचे भराव टाकून खाडी बुजविण्याचे उपद्व्याप सुरू असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खारफुटीचे थोडेफार जंगल असलेला मोठागाव, कोपर, देवीचापाडा, गणेशनगर हा एकमेव पट्टा डोंबिवलीत शिल्लक राहिला आहे. या भागातील खारफुटीचे संवर्धन व्हावे म्हणून पर्यावरणप्रेमींचा एक ग्रुप या भागात सक्रिय झाला आहे. या ग्रुपमधील सदस्यांना खाडी बुजवण्यासाठी टाकलेला भराव पाहून धक्का बसला. एकीकडे मुंब्रा ते डोंबिवली दरम्यान वाळू तस्करांकडून खारफुटीची बेसमुर कत्तल करण्यात आली आहे. आता खाडीमध्ये भराव टाकून खाडी बुजविण्याचे प्रयत्न भूमाफियांकडून सुरू आहेत. मोठागाव भागात खाडीवर मोठागाव-माणकोली उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आहे. या पुलाच्या पोहच रस्त्याचे काम मोठागाव स्मशानभूमी ते रेतीबंदर रेल्वे फाटकापर्यंतचे सुरू आहे. रेल्वे मार्गावर उड्डाण पूल प्रस्तावित आहे. केडीएमसीचा टिटवाळा ते काटई वळण रस्ता या भागातून जाणार आहे. या भागातील जमिनींचे भाव वधारणार आहेत. त्यामुळे या भागातील कांदळवन नियंत्रणाखालील सरकारी जागा हडपण्यासाठी, तसेच या जागांवर बेकायदा गाळे, इमारती, चाळी बांधण्यासाठी भूमाफियांनी मोठागाव खाडी किनारा बुजविण्याचे उपद्व्याप युद्धपातळीवर सुरू केले असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. मोठागाव-माणकोली पुलाच्या भागात खासगी आणि सरकारी मालकीच्या अशा दोनच प्रकारच्या जमिनी आहेत. या भागात येत्या काळात पेट्रोल पंप, व्यापारी गाळे, वाहन दुरूस्तीचे गॅरेज, वॉशिंग सेंटर, आदी मोठ्या संख्येने चालतील या विचारातून माफियांनी मोठागाव खाडी किनारपट्टीच्या जागा हडप करण्याचे षडयंत्र रचल्याचे स्थानिक रहिवाशी सांगतात.
गेल्या वर्षी मोठागाव जवळच्या देवीचापाड्यातील खाडी किनारी मातीचे भराव टाकून खारफुटी नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्या अज्ञात इसमांविरूध्द विष्णूनगर पोलिस ठाण्यात पर्यावरण दक्षता मंडळाच्या तक्रारीवरून चौकशीनंतर महसूल विभागाच्या अधिकार्यांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईवरून भूमाफिया दिवसा भराव टाकण्याऐवजी आता रात्रीच्या वेळेत खाडी किनारी भागात मलबा किंवा भराव टाकले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मोठागाव खाडी किनारपट्टी भागात खारफुटी नष्ट करून, खाडी किनारा बुजवून कुणी भराव टाकत असेल तर त्याची पाहणी करण्यात येईल. या प्रकरणी महसूल आणि पोलिस अधिकार्यांशी चर्चा करून संंबंधितांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या जाणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी सांगितले.