'माझी वसुंधरा अभियान ४.०' स्पर्धेत वेंगुर्ले नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला असून ७५ लाखाचे बक्षीस प्राप्त होणार आहे. या यशामुळे वेंगुर्लेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्वच्छतेसह पर्यावरण रक्षण यासारख्या सर्व क्षेत्रात वेंगुर्ले नगरपरिषदेने 'माझी वसुंधरा अभियान ४.०' अंतर्गत उत्कृष्ट काम केले आहे. त्यामुळे १५ हजारपेक्षा कमी लोकसंख्या या गटात वेंगुर्ले नगरपरिषदेला कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून ७५ लाखाचे बक्षीस मिळणार आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छतेमधून समृद्धीकडे आणि विकासाकडे जाण्याचा मार्ग दाखवून दिला आहे. आजपर्यंत अनेक पुरस्कार या नगरपरिषदेने मिळविले आहेत. मात्र स्वच्छतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा घेतलेला वसा कायम ठेऊन आपले काम सातत्याने पुढे नेले आहे. गेली अडीच वर्ष या नगरपरिषदेवर लोकप्रतिनिधी नसताना मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सर्वांना बरोबर घेऊन आपले काम योग्य रितीने पुढे नेले आहे.
शहरातील 'स्वच्छ भारत पर्यटन स्थळ' या नावातच त्याचे वेगळेपण आहे आणि ते टिकवून ठेवले आहे. याठिकाणी शहरातील घरोघरी निर्माण होणारा कचरा गोळा करुन त्याचे २७ प्रकारात वर्गीकरण करुन या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करुन वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत 'शून्य कचरा' संकल्पना राबविण्यात आली आणि ती यशस्वी झाली. हे पाहण्यासाठी आज देशभरातून अधिकारी, पर्यटक, नागरिक, विद्यार्थी येत असतात. शहरांमध्ये स्वच्छतेबरोबरच प्लास्टिक पिशव्यांवर बंदी, स्वच्छता मोहिमा, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे, विद्यार्थ्यांना स्वच्छतेबद्दल महत्व पटावे म्हणून स्वच्छतेवर आधारित विविध वक्तृत्व, चित्रकला, स्पर्धा घेणे, शहरामध्ये वृक्षारोपण करून नागरिकांमध्ये जनजागृती करणे असे विविध उपक्रम राबवत आहेत.