डोंबिवली : कल्याण-शिळफाटा आणि मुंब्रा-पनवेल जोड रस्त्यांवरील कल्याण फाटा चौकात उड्डाण पूल उभारणीच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याच्या हालचाली एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरू केल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी कल्याण-शिळ महामार्गावरील वाहतूक कोंडीचा विचार करून शासनाने या रस्त्यावर तीन उड्डाण पूल उभारणीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कल्याण फाटा येथे उड्डाण पूल आणि भुयारी मार्गाचा समावेश आहे.
जवळपास 200 कोटी खर्चाचे हे काम आहे. एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता गुरूदत्त राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची निविदा प्रक्रिया एमएमआरडीएने सुरू केली आहे. कल्याण फाटा येथे उड्डाण पूल उभारणीचा संकल्पन बांधकाम आराखडा नियुक्त प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने तयार करायचा आहे. 42 महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्याची अट निविदेत टाकण्यात आली आहे.
या उड्डाण पूल आणि भुयारी मार्गामुळे बदलापूर, अंबरनाथ काटई मार्गे शिळफाटा चौक दिशेने येणारी, कल्याण, भिवंडी, डोंबिवली, उल्हासनगरकडून येऊन नवी मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कल्याण फाटा येथे (दत्त मंदिर) उड्डाण पुलावरून थेट एमआयडीसीच्या जलवाहिन्यांवरील पुलावरून महापे-नवी मुंबई दिशेने जातील.
ठाणे-मुंब्रा भागाकडून येणारी वाहने कल्याण फाटा येथील उड्डाण पुलाखालील भुयारी मार्गिकेतून पनवेल, तळोजा भागाकडे जातील. यामुळे कल्याण फाटा चौकात होणार्या वाहन कोंडीतून आणि प्रवाशांची खोळंब्यातून कायमची मुक्तता होणार आहे. ग्रेड सेपरेशन या प्रणालीद्वारे हे काम केले जाणार आहे.
कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, आदी भागातून येणारी वाहने कल्याण फाटा (दत्त मंदिर चौक) येथून एमआयडीसीच्या जलवाहिन्या असलेल्या पोहच रस्त्यावरून खिंडीतून थेट महापे-नवी मुंबईकडे जातील, असे सुरुवातीला या पुलाचे नियोजन करण्यात आले होते. शिळफाट्या समोरच्या खिंडीतील एमआयडीसीच्या जलवाहिन्या अन्य भागात स्थलांतरीत करण्याचे काम खूप खर्चिक आहे. त्यामुळे जलवाहिन्या आहे त्याच ठिकाणी ठेऊन उड्डाण पुलाची सीमारेषा बदलून जलवाहिन्यांवरून पुलाची मार्गिका खिंडीतून महापे रस्त्याकडे जाणार्या मार्गिकेवर उतरविण्यात येणार आहे.
पुलावरील मार्गिका तीन मार्गिकांची करण्यात येणार होती. चार वर्षांपूर्वी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएकडे पाठपुरावा करून ही मार्गिका चार मार्गिकांची करावी, तसेच त्यासाठी वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली होती. खासदारांची ही मागणी प्राधिकरणाने मान्य केली आहे. उड्डाणपुलासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणार, तासांचा प्रवास काही मिनिटांत होणार आहे.
या उड्डाण पुलांव्यतिरिक्त काटई नाका, सुयोग हॉटेल अर्थात रिजन्सी अनंतम् प्रवेशद्वारासमोर उड्डाण पूल प्रस्तावित आहेत. या पुलांमुळे दोन्ही चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. पनवेल, नवी मुंबई, ठाणे, मुंबई भागातून कल्याण-शिळ महामार्गावरून जाणारी वाहने उड्डाण पुलांवरून थेट इच्छितस्थळी निघून जातील. स्थानिक शहरांतर्गत धावणारी वाहने या पुलांखालून इच्छितस्थळी जातील अशी योजना असल्याचे प्राधिकरणाच्या अधिकार्याने सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून शिळफाटा अर्थात कल्याण फाटा परिसराचा मोठ्या संख्येने ये-जा करणार्या वाहनांमुळे कोंडमारा होत आहे. वाहतूक कोंडीचा फटका कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, पनवेल, नवीमुंबई, मुंब्रा आणि ठाण्यातील प्रवाश्यांना पडतो. त्यामुळे ही वाहतूक कोंडी कमी कशी करता येईल याकरिता मनसेचे नेते तथा आमदार राजू पाटील यांच्या पुढाकाराने वाहतूक पोलिस, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि ठाणे महापालिकेच्या अधिकार्यांना घेऊन प्रत्यक्ष वाहतूक कोंडीची पाहणी दौरा केला. या दौर्यादरम्यान आमदार पाटील यांनी कल्याण/शिळफाट्यावरील उड्डाण पूल उभारणीच्या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.