विरार : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत महिला स्वतःला असुरक्षित मानत आहे. मागील आठ महिन्यांत 226 अत्याचाराचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत, त्याचबरोबर 197 महिलांसोबत छेडछाडीच्या गुन्ह्यांचा देखील समावेश आहे. तसेच 274 अल्पवयीन मुलींचे अपहरणाचे गुन्हे देखील समोर आले आहेत.
महिलांविरोधात होणार्या अत्याचाराला रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाद्वारे सामाजिक संघटनांना सोबत घेऊन विविध प्रकाराचे जनजागृती अभियान राबवले जात आहे. तरीही अशा प्रकारचे गंभीर गुन्हे वसई- विरार, मिरा भाईंदर आयुक्तलय क्षेत्रात कमी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.
या सर्व गुन्ह्यांत पोलिसांना आरोपींना गजाआड करण्यात 100 टक्के यश मिळाले असले तरी, शहरांमध्ये महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
वसई - विरार शहराला पालघर पोलीस ठाण्यापासून वेगळे करत मीरा-भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयाला जोडले गेले आहे, कारण शहरांमध्ये होणार्या गुन्हेगारीला आळा बसावा. यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी वसई -विरारमध्ये चार नवीन पोलीस ठाणी निर्माण केली. यामध्ये आचोळे, मांडवी, पेल्हार व नायगाव यांचा समावेश आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय निर्माण झाल्यावर काही वर्षांसाठी या क्षेत्रांमध्ये गुन्हेगारी कमी झाल्याचे चित्र दिसत होते, मात्र मागील दोन वर्षात गुन्हेगारीचा आलेख वर चढत आहे. यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट महिन्यापर्यंत मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालय क्षेत्रात अत्याचाराचे एकूण 226 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये महिलांवरील अत्याचाराचे 105 गुन्हे दाखल आहेत.