भिवंडी : शहरात भटक्या श्वानांची दहशत मागील काही वर्षात वाढली असून मागील महिन्यात दोन दिवसांत तब्बल 130 हून अधिक लहान मुले व नागरिकांना श्वानाने चावा घेतल्याच्या घटना घडल्या होत्या.
या हल्ल्यात एका चिमुरडीचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू देखील झाला. परंतु अजून पालिका प्रशासनाकडून भटक्या श्वानांसाठी निर्बीजीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर भटक्या श्वानांना आवर घालण्यासाठी पालिकेकडे सध्या कोणतीही यंत्रणा नसल्याने श्वान दंशाचे प्रकार शहरात वाढले आहेत. पालिकेने दोन वेळा निविदा प्रक्रिया राबविली; परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नव्हता. नुकताच डॉ. मुरली यांच्या संस्थेचा प्रस्ताव पालिकेने मान्य केला असून केंद्र उभारणीचे काम पालिका बांधकाम विभागाकडून सुरू असून येत्या काही दिवसात हे केंद्र सुरू होईल, अशी माहिती सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य विभागाचे प्रमुख जयवंत सोनवणे यांनी दिली आहे.
7 व 8 जुलै रोजी शहरात भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेत लायबा शेख या चिमुरडीचा उपचारा दरम्यान मुंबई येथे रुग्णालयात मृत्यू झाला होता. चिमुरडीच्या मृत्यूनंतर भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी मनपाच्या या हलगर्जीपणाचा तीव्र शब्दात निषेध करत यामध्ये दोषी असलेल्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत कायम आहे. त्यातून श्वान दंशाच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे.