Crime News  pudhari
ठाणे

Thane Crime : मिरा रोड सोसायटीत बकरे आणल्याने वाद चिघळला

दोन गट आमने-सामने : घोषणाबाजी, गोंधळानंतर ६० जणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

मिरा-रोड : मिरा रोडच्या शांतीपार्क परिसरातील पूनम इस्टेट क्लस्टर-०१ या गृहसंकुलात बकरी ईदनिमित्त आणलेल्या बकऱ्यांवरून निर्माण झालेला वाद मंगळवारी चांगलाच पेटला. काही रहिवाशांनी सोसायटी परिसरात बकरे ठेवण्यास विरोध करत आंदोलन छेडले, तर त्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गृहसंकुलाबाहेर जमा झाल्याने परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

घोषणाबाजी, गोंधळ, धक्काबुक्की आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी ८ मुख्य पदाधिकाऱ्यांसह ५० ते ६० जणांविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शांतीपार्क येथील पूनम इस्टेट क्लस्टर-०१ मधील काही मुस्लिम रहिवाशांनी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर सोसायटी परिसरात बकरे आणले होते. याला काही रहिवाशांनी विरोध दर्शवत बकरे तात्काळ इमारतीबाहेर हलवण्याची मागणी केली. यावरून सोसायटीतील दोन गट आमनेसामने आले आणि वातावरण तापले.

या वादाची माहिती परिसरात पसरल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमा झाले. सकाळी ११ पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलन सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आंदोलकांनी बकरे बाहेर काढा अशा घोषणा देत परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. काही कार्यकर्त्यांनी सोसायटी परिसरात डुकरे सोडण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला असून, त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले.

दरम्यान, या गोंधळात काही जणांमध्ये धक्काबुक्की व मारहाण झाल्याचेही समोर आले आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन काशिमीरा पोलिसांनी तातडीने मोठा बंदोबस्त तैनात केला. पोलिसांनी आंदोलकांना वारंवार शांततेचे आवाहन करत परिसरात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाची माहिती दिली.

पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी असल्याचे सांगत पोलीस आयुक्तालयाच्या मनाई आदेशाची प्रतही आंदोलकांना दाखवण्यात आली. याप्रकरणी ८ मुख्य आरोपींसह ५० ते ६० अज्ञात व्यक्तींविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास काशिमीरा पोलीस करत आहेत.

दरम्यान, मिरा-भाईंदर शहरात गेल्या काही वर्षांपासून बकरी ईदच्या काळात अशाप्रकारचे वाद वारंवार समोर येत आहेत. यंदाही दोन दिवस सुरू तणावामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांचा कडक बंदोबस्त

आदेशाची माहिती असूनही काही जणांनी घोषणाबाजी सुरूच ठेवत सोसायटीच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच पोलीस आयुक्त राहुल चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत पिंगळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT