शहापूर : राजेश जागरे
तानसा अभयारण्याभोवती इको सेन्सिटिव्ह एरिया निर्माण करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालयाने सुरू केलेली असून बाधित जमीन मालकांना हरकत घेण्याची संधी दिली असता लोकहित फाउंडेशन शहापूर यांनी केलेल्या सूचनांची सकारात्मक दखल घेऊन उपवनसंरक्षक शहापूर कार्यालयाने प्रस्तावासह नकाशा केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाला पाठविण्यात आला असल्याची माहिती या चळवळीचे अभ्यासक तथा लोकहित फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. निखिल खाडे यांनी दैनिक पुढारीशी बोलतांना दिली.
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या 7 मे 2024 च्या अधिसूचनेनुसार ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी व पालघर जिल्ह्यातील मोखाडा व वाडा या तालुक्यातील पर्यावरण संवेदनशील विभागाचे क्षेत्रफळ 475.160 चौरस किलोमीटर एवढे आहे. म्हणजे तानसा अभयारण्याच्या सीमेपासून जवळजवळ 1 ते 9 किलोमीटरचे परिघ अंतर येऊ घातलेल्या इको सेन्सिटिव्ह झोनमुळे बाधित होऊन त्यांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता लोकहित फाउंडेशनने वर्तविली होती.
त्यानुसार फाउंडेशनसोबत सभा आयोजित करून तानसा इको सेन्सिटिव्ह झोन 1 कि.मी. ऐवजी जेथे रेल्वे लाईन तानसा अभयारण्यालगत आहे. तेथे 0 मीटर आणि इतर ठिकाणी कमीत कमी 100 मीटर बफर झोन ठेवण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने 16 जुलै 2025 रोजी लोकहित फाउंडेशन, शहापूर यांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन तसा प्रस्ताव आणि नकाशा केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे.
दरम्यान अनेक वर्षांपासून विकासापासून दुर्लक्षित असणारा शहापूर तालुका आताच कुठे शेतीबरोबर उद्योगधंदे व वाणिज्य क्षेत्रामध्ये कात टाकत आहे. उद्योगधंद्यांच्या विकासामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या आशेने सर्वजण नवीन प्रकल्पांची वाट पाहत आहेत.
तानसा इको झोनबाबतचा प्रस्ताव केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाला सादर केल्यामुळे आमच्यासाठी हे पहिले सकारात्मक पाऊल आहे. परिणामी दिल्ली येथे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयालाकडे पाठपुरावा करण्यात व गरज पडल्यास न्यायिक लढाईत याचा फायदा होणार आहे. तसेच शहापूर प. घाट इको सेन्सिटिव्ह झोनबाबतही फाऊंडेशनच्या माध्यमातून हरकती घेण्यात आल्या असून त्याबाबतची लढाई तीव्र करण्याची तयारी सुरू केली आहे.निखिल खाडे, अध्यक्ष- लोकहित फाउंडेशन