बदलापूर : बदलापूरजवळील चिंचवली आणि कोपर्याची वाडी या दोन गावात इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये दगड खाण सुरू होती. या दगड खाणीमुळे भूस्खलन आणि दरड कोसळून गाव उध्वस्त होण्याची भीतीने गावकरी भयभीत झाले होते. अखेर या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने या दगड खाणीच्या मालकाला परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने लक्ष्मी स्टोन इंडस्ट्रीचे विश्वनाथ पनवेलकर यांना 190 कोटीचा दंड ठोठावला आहे.
राज्यातील दगड खाणीला इतक्या मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे. दगड खाणीमुळे गावकर्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे ही दगडखाण बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सुद्धा हे दगडखाण बंद होत नव्हती. अखेर गेल्या दोन वर्षांपासून वनशक्ती या सामाजिक संस्थेने यासंदर्भात गावकर्यांसोबत वनशक्तीचे कार्यकर्ते नंदकुमार पवार आणि कोपर्याची वाडीतील स्थानिक रहिवासी भास्कर वरघडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात एकत्र लढा दिला.
त्यानंतर या दगड खाणीच्या मालकाला परवानगी क्षेत्राच्या बाहेरील जागेत 1 लाख 30 हजार ब्रास दगड खाणीचं उत्खनन केल्याने आणि त्याची रॉयल्टी न भरल्याने 190 कोटी 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. शिवाय जिल्हाधिकार्यांनी सक्तीने त्याची अंमलबजावणी करावी असे आदेश देखील उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता ही दगडखाण बंद होणार असल्याने गावकर्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले आहे.
ही दगडखाण बंद होणार असल्याने आमचे आरोग्य संदर्भात होत असलेली हानी थांबणार असल्याचं भास्कर वरगडा यांनी सांगितले. शिवाय आम्ही आता भयमुक्त वातावरणात राहणार आहोत. निसर्गरम्य वातावरणात जगणार आहोत, त्यामुळे गावकर्यांनी या संदर्भात समाधान व्यक्त केलं आहे.
ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. जमीनही नापीक झाल्या आहेत. पिण्याचे पाण्याचे झरे हि बंद झाले होते. त्यामुळे या विरोधात वनशक्तीच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हाधिकार्यांनी लावलेल्या दंडावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करत सक्तीने वसुलीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना होणारा त्रास बंद होणार असून जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी याबाबत तातडीने कारवाई करावी.नंदकुमार पवार, याचिकाकर्ते आणि वनशक्तीचे सदस्य