ठाणे : एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (150 कि.मी.पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणार्या पूर्ण तिकीटधारक (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे.
या योजनेची सुरुवात 1 जुलैपासून करण्यात येत असल्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. 1 जूनला एसटीच्या 77 व्या वर्धापनदिनी सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामात लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणार्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास 15 टक्के सूट देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी लागू करण्यात येत आहे.
मुंबई-पुणे मार्गावर धावणार्या एसटीच्या प्रतिष्ठित ई-शिवनेरी बसमधील पूर्ण तिकीट काढणार्या प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणार्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा एमएसआरटीसी बस रिझर्व्हेशन या मोबाईल अॅपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना 15 टक्के सवलत प्राप्त करता येऊ शकते.