ठाणे : डोंबिवली, ठाणे आणि भाईंदरला जोडणार्या जलवाहतूक प्रकल्पाच्या रखडलेल्या कामाबाबत दैनिक पुढारीने वाचा फोडली. त्याचे पडसाद सोमवार (दि.16) संसदेच्या अधिवेशनात उमटले. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधून कामाला गती देण्याची मागणी केली.
‘जलवाहतुकीच्या कामाला सत्तांतराचा फटका ’ या मथळ्याखाली दैनिक पुढारीमध्ये 13 डिसेंबर रोजी या रखडलेल्या प्रकल्पाबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. सोमवार (दि.16) संसदेच्या अधिवेशनात डोंबिवली, ठाणे आणि भाईंदरला जोडणार्या मुंबईतील जलवाहतुकीच्या संदर्भात संसदेत नियम 377 अन्वये खासदार म्हस्के यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने (एमएमबी) अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीच्या अंमलबजावणीद्वारे मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) दुर्गम नागरी भागांना जोडण्याची योजना आखली आहे. भाईंदर, कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली येथे चार जेट्टी बांधून सुरुवातीला मिरा-भाईंदर, ठाणे, भिवंडी आणि डोंबिवली शहरे जलवाहतुकीद्वारे जोडली जाणार आहेत. पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी वसई खाडी-उल्हास नदीवर प्रवासी जलवाहतूक चालविली जाईल, जी लोकसंख्या आणि रहिवासी क्षेत्राच्या विस्तारासह एमएमआरमध्ये विकसित केलेल्या प्रवासाच्या पद्धतींना पूरक ठरेल, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात दिली. सागरमाला योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारने 96 कोटी 12 लाख रुपये खर्च करून या चार जेट्टींचे बांधकाम दीड वर्षांत पूर्ण करणे अपेक्षित आहे. अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक व्यवस्था लोकांमध्ये लोकप्रिय करण्याची गरज आहे, परंतु नोकरशाही आणि आर्थिक आव्हानांमुळे आंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी संथगतीने सुरू असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
प्रवासी जलवाहतूक सुविधा तयार झाल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य सरकारला प्रवासी फेरी किंवा वॉटर टॅक्सी चालकांची ओळख पटवावी लागणार आहे. जसे की फेरी घाट ते मांडवा दरम्यान रो-पॅक्स सेवा, तसेच त्याच मार्गावरील पारंपारिक फेरी सेवा लोकप्रिय आहेत, असे खासदार म्हस्के यांनी सांगितले.
एमएमआरमधील वाढती लोकसंख्या आणि रहिवासी क्षेत्र लक्षात घेता अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीची अंमलबजावणी लवकर होणे गरजेची आहे. राष्ट्रीय जलमार्ग 53 लगत आणखी जेट्टी बांधण्याची योजना असली तरी ती नंतर बांधली जाणार असून वसई, कल्याण, पारसिक, नागलाबंदर, अंजुर दिवे आणि घोडबंदर/गायमुख या भागात ते काम होणार आहे. घोडबंदर येथील गायमुख येथे जेट्टी कार्यरत असून त्याचा वापर फ्लोट चालविण्यासाठी केला जात असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
मुंबईतील अंतर्देशीय प्रवासी जल वाहतूक प्रणालीची अंमलबजावणी एमएमआरमधील कनेक्टिव्हिटी आणि प्रवास सुलभता सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. उपलब्धता, परवडणारी क्षमता आणि सुविधा यासारख्या विविध घटकांवर हि सेवा अवलंबून आहे. हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकार्यांना लवकरात लवकर आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात आणि प्रकल्प पूर्ण करण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर करावेत, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.