डोंबिवली : भारतात बेकायदा वास्तव करत असलेल्या मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सहा बांगलादेशीयांना आज (दि.२०) पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे आढळून आले नाहीत.
दोन दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेत विठ्ठलवाडीमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी पती-पत्नीला अटक करण्यात होती. हे दाम्पत्य मागील सात वर्षांपासून कल्याणमध्ये राहत होते. पती एका वाहनावर चालक, तर पत्नी एका हाॅटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होती. मानपाडा पोलिसांना हद्दीत बांगलादेशी नागरिक राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने माहितीची खात्री केल्यावर त्यांना सहा बांगलादेशी राहत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या सहा बांगलादेशींना ताब्यात घेतले. या सहा जणांकडे व्हिसा, नागरिकत्व आदी कागदपत्रांची मागणी केली असता पोलिसांना ते एकही कागदपत्र दाखवू शकले नाहीत. बिसू शेख, रुमान पोकीर, दिलावर हुसेन, आरीफ मुल्ला, आरीफ मोफिजून आणि एक अज्ञात महिला अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.