टिटवाळा : शिवजयंतीच्या मंगलमय वातावरणात इतिहास, भक्ती आणि शौर्याचा संगम अनुभवास मिळाला. वसई तालुक्यातील भाताणे गावातील तरुणाने अवघ्या एका सेंटीमीटरच्या कवडीवर शिवरायांची प्रतिमा साकारली आहे. कवडीवर साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची तेजस्वी प्रतिमा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. ही सूक्ष्म, पण आशयाने विराट कलाकृती तरुण चित्रकार कौशिक दिलीप जाधव यांनी केवळ तीस मिनिटांत वॉटर कलर्सच्या साहाय्याने साकारली आहे.
कवडी हा केवळ अलंकार नव्हता; तो श्रद्धेचा आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक मानले जाते. शिवरायांच्या गळ्यातील कवड्यांची माळ त्यांच्या कुलस्वामिनी तुळजाभवानीप्रती असलेल्या अखंड निष्ठेची साक्ष मानली जाते. या ऐतिहासिक आणि धार्मिक भावविश्वातून प्रेरणा घेत जाधव यांनी कवडीची निवड केली आणि बोटावर मावणाऱ्या त्या लहानशा पृष्ठभागावर शिवरायांचा विराट इतिहास उभा केला.
इतिहासातील सिंहगडाच्या लढाईचा हृदयद्रावक प्रसंग या कवड्यांशी जोडला जातो. स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे शूर सरदार तानाजी मालुसरे यांच्या वीरमरणानंतर व्यथित झालेल्या शिवरायांनी स्वतःच्या गळ्यातील पवित्र कवड्यांची माळ त्यांच्या पार्थिवावर अर्पण केल्याची भावस्पर्शी नोंद आढळते.
आजही या ऐतिहासिक माळांपैकी काही मोजक्या माळा साताऱ्यातील सातारा राजवाडा तसेच तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर येथे जतन करून ठेवल्या असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कवडी ही केवळ शंख-शिंपल्यातील वस्तू नसून ती स्वराज्याच्या इतिहासाची जिवंत साक्ष ठरते. कौशिक यांच्या कलाकृतीत शिवरायांच्या चेहऱ्यावरील तेज, डोळ्यांतील निर्धार आणि मुकुटातील बारकावे विलक्षण अचूकतेने टिपले गेले आहेत.
रंगसंगतीचा समतोल राखत, रेषांची शिस्तबद्ध मांडणी करत तयार केलेले हे चित्र म्हणजे संयम, एकाग्रता आणि निष्ठेचा परिपाक आहे. ही केवळ कलाकृती नाही; ती शिवशौर्याची प्रतीकात्मक अभिव्यक्ती आहे.
स्वराज्याचे तेज झळकले
शिवजयंतीच्या निमित्ताने उलगडलेली ही आगळीवेगळी सर्जनशीलता परिसरात कौतुकाचा विषय ठरली असून सामाजिक माध्यमांवरही तिची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली जात आहे. तरुण पिढीने इतिहासाशी नाळ जोडत, आधुनिक कलेच्या माध्यमातून अभिव्यक्ती कशी मांडावी, याचे हे प्रभावी उदाहरण ठरले आहे. एका लहानशा कवडीवर उभा राहिलेला स्वराज्याचा विराट इतिहास जणू एक संदेश देतो. आकार लहान असला तरी आशय महान असू शकतो. श्रद्धा आणि इतिहासाची जाण असेल, तर कवडीसुद्धा स्वराज्याचे तेज झळकवू शकते.