अंबरनाथ: नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाने युती न करता एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढली होती. या निवडणुकीनंतर शिवसेना- भाजपाचे युती होईल अशी अपेक्षा असताना मागील पाच महिन्यांपासून युती न झाल्याने त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होताना दिसत आहे.
त्यामुळे शहर विकासासाठी दोन्ही पक्ष्यांनी मैत्रीचा हात पुढे केला आहे. येत्या काही दिवसात युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केले असून या मैत्रीबाबत भाजपाने देखील सकारात्मक भूमिका मांडली आहे.
अंबरनाथ नगरपालिकेची 20 डिसेंबर 2025 रोजी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती न झाल्याने नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत प्रथमच भाजपाने शिवसेनेच्या तगड्या उमेदवाराचा पराभव केला. तर या निवडणुकीत शिवसेनेचे 27, भाजपा चे 14, काँग्रेस 12, राष्ट्रवादी 4 आणि अपक्ष 2 असे एकूण 59 नगरसेवक निवडून आले.
मात्र सत्ता समीकरण जुळवताना काँग्रेस चे नगरसेवक भाजपा मध्ये विलीन झाले. तर राष्ट्रवादी च्या चार नगरसेवकांनी व एका अपक्षा ने देखील भाजपा ला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपा चे संख्याबळ 31 इतके झाल्याने सर्वात मोठा पक्ष असूनही शिवसेनेने विरोधात बसण्याची मानसिकता तयार केली होती.
मात्र अचानक राष्ट्रवादी च्या चार नगरसेवकांनी भाजपा ची साथ सोडत शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे पुन्हा पालिकेतील सत्ता समीकरण बदलले. आणि शिवसेना सत्ता केंद्र बनली. मात्र संख्याबळाच्या मुद्द्यावर भाजपा ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने हा निर्णय जिल्हाधिकारी यांनी द्यावा असे आदेश दिले.
हा निर्णय देखील शिवसेनेच्या बाजूने लागल्याने शिवसेनेकडे 32 इतके संख्याबळ झाले. मात्र शिवसेना- भाजपातील या वादाचा परिणाम शहर विकासावर होत असल्याचे लक्षात आल्याने शिवसेनेने मोठ्या भावाची भूमिका बजावत एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून युतीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भाजपा ने देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याने येत्या काही दिवसात युती ची अधिकृत घोषणा होण्याची चिन्हे आहेत.
लवकरच युतीची घोषणा
शिवसेनेचे स्थानिक नेते व माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, नगरसेवक कुणाल भोईर यांनी शिवसेनेच्या काही नगरसेवकांसह पत्रकार परिषद घेवून भाजपसमोर युतीचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावाला भाजपा चे स्थानिक नेते गुलाबराव करंजुले-पाटील यांनी देखील सकारत्मक प्रतिसाद दिला व शहर विकासाच्या मुद्यावर आम्ही कोणताही इगो करणार नाही. लवकरच वरिष्ठांशी चर्चा करून युती ची घोषणा करू असे त्यांनी बोलताना सांगितले.